অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आणि पावले शेताकडे वळू लागली...

आणि पावले शेताकडे वळू लागली...

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साधारण अकराशे लोकसंख्येचे पुनर्वसन झालेले ‘आव्हाटे’ गाव. गावातील 80 ते 85 टक्के नागरिक आदिवासी शेतकरी कुटुंबातील आहेत. उर्ध्व वैतरणा प्रकल्पाच्या परिसरात गाव असूनही उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक नागरिक स्थलांतर करत. मात्र लोकसहभागातून आव्हाटे आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना उभी राहिली आणि गावातील तरुणांची पावले शेताकडे वळू लागली.सामान्यत: उपसा सिंचन योजनांची मोठ्या प्रमाणात येणारी वीज बिले व त्यांची थकीत न भरल्यामुळे या योजना बंद पडतात. तसेच जवळपासच्या धरणातून, तलावातून पाणी घेताना ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेलच याची हमी नसते. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना पुढे आली. याच तत्वावर आधारीत योजनेचा 280.46 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. 2013 मध्ये आव्हाटे गावातील 219 हेक्टर क्षेत्रात ही योजना कार्यान्वित झाली.

आव्हाटे गाव डोंगराळ भागात असल्याने ही योजना राबविताना या योजनेतील 219 हेक्टर क्षेत्र आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आले आहे. प्रत्येक गटासाठी त्याच्या क्षेत्रानुसार आवश्यक अश्वशक्तीचे वीजपंप देण्यात येवून स्वतंत्र पाइपलाईन गृहीत धरुन नियोजन केले गेले. डोंगराळ भाग असल्याने गावाच्या उंच ठिकाणी वितरण कुंड बांधण्यात आले आहे. प्रत्येक गटाची आवश्यकता लक्षात घेवून विद्युत पंप व पी. व्ही.सी. पाईप्सची तरतुद केली आहे. यासाठी 65 अश्वशक्तीपेक्षा कमी अश्वशक्तीचे वीजपंप वापरण्यात आल्याने वीज बिलांमध्ये देखील बचत झाली आहे.प्रत्येक रायझिंग मेनच्या टोकावर गटातील सर्वोच्च ठिकाणी वितरण कुंड बांधण्यात आले आहे. या बंदिस्त पात्रामध्ये पाणी समान पातळीवर स्थिर होते. त्यानंतर मुख्य वितरण टाकीमधून जितक्या क्षेत्रासाठी पाणी वाटप करायचे आहे, तितके पाईप एकाच समान पातळीवर बसविण्यात आले असून त्यापुढे एका पाइपद्वारे पाणी एकत्र करून एका पाईपच्या माध्यमातून शेतापर्यंत पोहोचविले जाते. यामुळे गटातील प्रत्येक शेतकऱ्याला समन्यायी पद्धतीने पाणी मिळण्यास मदत होवून पाण्याचा अतिरिक्त होणारा वापर देखील टळला आहे. त्याबरोबरच पाण्याची व विजेची बचत होण्यास मदत झाली आहे. उन्हाळ्याच्या काळातील पाणी टंचाईवर मात करून आता उन्हाळ्यात देखील आव्हाटेमधील शेतकरी भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांद्वारे उत्पन्न घेत आहे.

आव्हाटेच्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत तर सुधारणा झाली आहेच. परंतु कामासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांनी ठिबक पद्धती अवलंबल्यामुळे ते बागायती पिकेदेखील घेत आहेत. उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 10 हजाराच्या आत असायचे. पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत बदल होऊन शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न लाखाच्या घरात आहे. त्यामुळे येथील शेतकरी आशावादी होऊन प्रगतीचे स्वप्न बघू लागला आहे.

लेखक - अर्चना वि. देशमुख
सहाय्यक संचालक, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate