साँसो को भी मिलता नहीं शुद्ध हवा का झोंका
सोंचो कौन कर रहा है किसके साथ धोका...
हो...आता विचार करण्याची वेळ आली आहे, नव्हेतर वेळीच प्रत्यक्ष कृती करून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाजी गरज बनली आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळत असलेला समतोल आणि त्याचे दुष्परिणाम या ना त्या स्वरूपात समस्त जीवसृष्टीला जाणवू लागले आहेत. वारंवार होणारे भूकंप, त्सुनामी, वादळे, दुष्काळ, ढगफुटी, महापूर, रोगराई अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. निसर्गाचे बदललेले हे चक्र म्हणजेच पर्यावरणाचा असमतोलपणा होय ! हा असमतोलपणा वेळीच दूर करून संतुलित पर्यावरणाचा ढाच्या अबाधित ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
पर्यावरण म्हणजेच Environment हा इंग्रजी शब्द Environ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजिवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा याचा अर्थ होतो. या परिस्थितीवरच समस्त जीवसृष्टी आणि पृथ्वी म्हणजेच वसुंधराचे अस्तित्व अवलंबून आहे. परंतु एकीकडे जल, वायू आणि मृदा प्रदूषणाचा वाढता अतिरेक, त्यामुळे पृथ्वीचे वाढणारे तापमान, निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र, पर्जन्याचे कमी होत जाणारे प्रमाण, वारंवार निर्माण होणारा दुष्काळ, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, पाण्याचा मर्यादित साठा, भरमसाठ होणारा अपव्यय या आणि अशा अनेक कारणांमुळे केवळ मानवजातच नव्हे तर पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीच धोक्याच्या सीमेवर येवून उभी राहिली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन समस्त मानव जातीने पर्यावरण संवर्धनासाठी वेळीच जागृत होऊन त्या दिशेने पाऊल टाकणे ही काळाची गरज बनली आहे.
खरेतर छोट्या छोट्या कृतींमधून पर्यावरणाचे संवर्धन करणे हे अगदी सहज शक्य आहे. परंतु यासाठी खरी गरज आहे ती जाणीव आणि जबाबदारीची. आपल्या रोजच्या जीवनातील अशा असंख्य बाबी आहेत, ज्यामधून आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो. उदा. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबविणे, वीज, गॅस, पेट्रोलची बचत करणे, कागदाचा वापर जपून करणे, पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे, वृक्ष तोड थांबविणे, शक्य तिथे झाडे लावणे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, रोजच्या जगण्यातील रासायनिक घटकांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करणे, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अशा अनेक कृतींमधून पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते. अगदी जाताजाता फळांच्या बिया जरी रानावनात, मोकळ्या जागेवर फेकल्या तरी त्यातून अनेक वृक्षांची निर्मिती होऊ शकते. इतकेच नव्हे तर आपले सणवार देखील हे निसर्गाचे पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धन करणारे आहेत. वट पौर्णिमेला आपण वडाच्या झाडाची पूजा करतो तर शिवरात्रीला बेलाच्या झाडाची पूजा करतो. दसरा हा सण देखील आपटा, कांचन-शमी या वृक्षांबाबत आदर व्यक्त करणारा सण आहे. म्हणजेच पर्यावरणाचे संवर्धन हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या संस्कृतीची जोपासना करणे आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारा वातावरणातील ओझोनचा थर कमी होऊ लागला आहे. ही धोक्याचीच नांदी म्हणावी लागेल. वायू प्रदूषणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रचंड प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. याशिवाय शीतगृहातून बाहेर पडणारा क्लोरो-फ्लूरो कार्बन हा देखील पर्यावरणाचे आतोनात नुकसान करणारा वायू आहे. या सर्व परिस्थितीला वेळीच आळा घालणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी आपण सर्वजण पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊया आणि आपली वसुंधरा अधिक सुंदर बनवूया !
लेखिका - अर्चना जगन्नाथ माने
माहिती सहाय्यक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/22/2020
बेभरवशाचा नि बेमोसमी पाऊस... पर्यावरणाचा बिघडत चाल...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
जलस्वराज्य आणि इतर वन्यप्राण्यांचा वाटा काढणारे र...
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक श...