অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मकर-संक्रांत

मकर-संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय. माणसाचे जीवनही अंधकार व प्रकाश ह्यांनी वेष्टिलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढ-या तंतूंनी विणलेले आहे. आजच्या दिवशी माणसानेही संक्रमण करण्याचा शुभ संकल्प करावयाचा असतो.

संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलती. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून या काळाला उत्तरायण जोडलेले आहे. ह्या दृष्टीने ह्या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्याही वेगळे महत्व आहे.

तमसो मा ज्योतिर्गमय

'तमसो मा ज्योतिर्गमय' - अंधारातून प्रकाशाकडे प्रयाण करण्याची वैदिक ऋषींची प्रार्थना ह्या दिवसाच्या संकल्पित प्रयत्नाच्या परंपरेने साकार होणे शक्य आहे. कर्मयोगी सूर्य स्वत:च्या क्षणिक प्रमादाला झटकून अंध:कारावर आक्रमण करण्याचा ह्या दिवशी दृढसंकल्प करतो. मकर संक्रांतीपासून अंधार हळूहळू कमी-कमी होत जातो. चांगली कामे करायला ह्या शुभ दिवसाने सुरुवात होते. मृत्यू येणारच असेल तर तो मकर संक्रांतीनंतर म्‍हणजेच उत्‍तरायणात यावा असाही एक विचार प्रवाह आहे. कृतान्‍त यमराजाला उत्‍तरायणापर्यंत थांबवून धरणारे भीष्‍म पितामह हयासंबंधाचे ज्‍वलंत उदाहरण आहे.

अग्री, ज्योति व प्रकाश यांनी युक्त गती म्हणजे शुक्ल गती आणि धूसर व अंधाराने युक्त गती म्हणजे कृष्ण गती ह्या दृष्टीने पाहता उत्तरायणात मृत्यूची आकांक्षा म्हणजे तेजस्वी व प्रकाशमय मरणाचा जप. धुरासारखे काळे अन् अंधकारासारखे भयदायक जीवन माणसाला निकृष्ट मृत्यूकडे ओढून नेते.

प्रकाशाचा अंधकारावर विजय

मकर-संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय. माणसाचे जीवनही अंधकार व प्रकाश ह्यांनी वेष्टिलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढ-या तंतूंनी विणलेले आहे. आजच्या दिवशी माणसानेही संक्रमण करण्याचा शुभ संकल्प करावयाचा असतो.

सम्‍यक क्रांती

संक्रांती म्‍हणजे सम्‍यक क्रांती क्रांतीमध्‍ये परिस्थिती परिवर्तनाची आकांक्षा असते. तर संक्रातीमध्‍ये  सम्‍यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी केवळ संदर्भ नाहीत तर मानवी मनाचे संकल्पही बदलले या दिवशी संघयुक्त होण्याचा संकल्प करायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इ. विकारांच्या परिभाषापासून शक्य तेवढे मुक्त राहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्‍हणजेच मुक्‍त जीवनाच्‍या लोकांचा संग केला पाहिजे. असे जीवनमुक्त लोकच आपल्या क्रांतीला योग्य रस्ता दाखवू शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात.

संक्रांती म्‍हणजे संघ क्रांती कोणत्‍याही महान कार्याला संघटनेची गरज असते. संघात विशिष्‍ट शक्‍ती निर्माण होते. ह्या विशाल विश्वात कोणतेही काम करण्यासाठी एकटा माणूस अपुरा आहे. त्याच्या शक्तीला मर्यादा आहे. मात्र संघटनेमध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्ती विपूल प्रमाणात एकत्रित होतात व त्या कोणतेही कार्य सहज शक्य बनवतात.

आपल्या राज्यात तर हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवात तिळाच्या लाडवांना महत्व मिळाले त्याचे नैसर्गिक कारणही आहे. निसर्ग ऋतूनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते त्या ऋतूत त्या रोगानुसार औषधे, वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा अवयव अन अवयव आखडून गेलेला असतो. थंडीचा परिणाम झालेला असतो आणि शरीर रूक्ष आलेले असते, अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा स्निग्धतेचा गुण असतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खादयाची गरज पूर्ण करतात. अशावेळी शुष्क बनणा-या शरीरासाठी ह्याच्याहून अधिक दुसरे योग्य औषध कोणते असू शकते?

ह्या उत्सवानिमित्त स्नेह्यांकडे जायचे असते. तिळगुळ दयायचे असतात, जुने मतभेद काढून टाकायचे असतात. भांडणे विसरायची असतात आणि स्नेहाची पुन्हा प्रतिष्ठापना करायची असते.

या दिवशी देशाचा काही भागात पतंग उडविण्याची प्रथा आहे त्‍याच्‍या पाठीमागेही विशिष्‍ट अर्थ आहे. प्रामुख्‍याने पतंग उडविण्‍यासाठी मोकळया मैदानात जावे लागते आणि त्या अनुषंगाने थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते. तात्विक दृष्टीने पाहता, आपल्या जीवनाचा पतंगही या विश्वामध्ये असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात जागी उभी राहून रंगांचे पतंग उडताना दिसतात तसे या विश्वाच्या विशाल जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते. सूत्रधाराच्या हातातून सुटलेला पतंग जसा कुठेही भरकटत गेलेला पहायला मिळतो तसा त्या अदृश्य शक्तीच्या हातातून सुटलेला मानवरूपी पतंगही थोड्यात दिवसात रंग उतरलेला, फिक्का व अस्वस्थ झालेला पहायला मिळतो.

थोडक्यात ह्या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश तीळाचा स्नेह, गुळाचा गोडवा व पतंगाचा त्याच्या सूत्रधारावरचा विश्वास आपल्या जीवनात साकार झाला तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले असे म्हणता येईल.

लेखक : प्रा. महेश दत्त कळेकर, कोल्हापूर

स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जाने २०१७

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate