नवीन लागवड केलेल्या कलमांना पाणी कमी पडले तर त्यांची वाढ खुंटते. काही वेळा पाण्याचा अति ताण पडला, तर नवीन लावलेली कलमे दगावण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता पुरेसे पाणी व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.
नवीन फळबाग लागवडीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जमिनीतील उपलब्ध पाणी आणि तीव्र उन्हापासून रोपांची काळजी घेण्यासाठी पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकांचा वापर करावा.
नवीन लागवड झाल्यानंतर कलमे - रोपांना वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा, त्यावर झाडाचे खोड सैलसर बांधावे. कलम चांगले वाढू लागल्यावर कलमावरची बांधलेली प्लॅस्टिकची पट्टी सोडून घ्यावी. पुढील वाढीच्या काळात सोसाट्याच्या वाऱ्यापासून फळांचे व झाडाचे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडे लावावीत. रोपांच्या कोवळ्या शेंड्यांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमाच्या चारही बाजूंनी बांबू रोवून त्यावर मांडव करावा. सावलीसाठी तुराट्याचा, पाचटाचा, भाताचे तणीस किंवा वाळलेल्या गवताचा वापर करावा. दक्षिण व पश्चिम बाजूंनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुराट्याचा कूड करावा.
उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे बरेच पाणी वाया जाते. ते रोखण्यासाठी फळझाडांच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये पाचट, तणीस, गव्हांडा, वाळलेले गवत, भुसकट किंवा पॉलिथिन शीट यांसारखे आच्छादन पसरून टाकावे, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते.
रोपांच्या किंवा झाडांच्या मुळांपाशी पिकांच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. या पद्धतीमुळे रोपांच्या मुळ्यांच्या परिसरातील भाग नेहमी ओलसर राहतो. पाण्याद्वारे खते देता येतात. कमी क्षेत्रातील जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. याकरिता झाडांच्या वाढीनुसार साधारण पाच ते सात लिटर पाणी बसेल एवढी लहान लहान मडकी पहिल्या दोन ते तीन वर्षांकरिता वापरावीत. या पुढील जास्त वयाच्या झाडांकरिता 10 ते 15 लिटरची मडकी निवडावीत. ती शक्यतो जादा छिद्रांकित किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. म्हणजे ती आपोआप झिरपत राहतात. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या खालील बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी (केसर) बसवावी, जेणेकरून पाणी लवकर गळून जाणार नाही. प्रत्येक झाडास दोन मडकी बसवावीत. ती बसविताना प्रथमतः मडक्याच्या आकाराचा खड्डा खोदून तेथे मडके गळ्याबरोबर जमिनीत पुरावे आणि त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. हे पाणी मडक्यावाटे झिरपत राहते. ही पद्धत मोठ्या बागेत वापरता येत नाही. कारण मडके भरण्यासाठी मजुरांचा खर्च वाढत राहतो. ही पद्धत कमी क्षेत्रात फायदेशीर आहे. सीताफळ, आंबा, आवळा, पेरू यांसाठी चांगली आहे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी, लाकडी फळी, जाड कागद किंवा खपट याचा वापर करून झाकण करावे, त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही.
कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्रांचे संपर्क क्रमांक :
1. 02426 - 243861
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
2. 02358 - 280233, 280238
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
3. 0724 - 2259262
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
4. 02452 - 229000
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मार्च ते मे या कालावधीत फळबाग सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. अशा परिस्थितीत लागवड केलेल्या कलमांना पाणी देणे अतिकष्टाचे होते, हे लक्षात घेऊन फळबागेत "कोकण जलकुंड' तयार करावे, त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उपलब्धता होते.
कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. या फळबागांना उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन करणे अवघड जाते. कोरडवाहू फळपिकांना प्रारंभिक तीन वर्षांच्या काळात सिंचनाची गरज असते, त्यामुळे फळबागांच्या सिंचनासाठी आता अस्तरीत शेततळ्याचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डोंगर उतारावरील आंबा आणि काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी "कोकण जलकुंड' तंत्रज्ञान विकसित केले आहे. या जलकुंडासाठी सिल्पॉलीन प्लॅस्टिकचे (200 जीएसएम) अस्तरीकरण केलेले असते. अशा खड्ड्यांमध्ये निव्वळ पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर पावसाळ्यानंतर फळपिकांना करण्यात येतो.
नवीन आंबा किंवा काजू लागवडीत दर दहा झाडांमध्ये जमीन जर डोंगर-उताराची व खडकाळ असल्यास 4 x 1 x 1 मी. किंवा 2 x 1 x 2 मी. या मापाचा खड्डा खोदावा. अशा खड्ड्यांना व्यवस्थित चौकोनी आकार द्यावा. जांभ्या जमिनीच्या खड्ड्यातील बारीक दगडांची अणकुचीदार टोके काढून टाकावीत आणि खड्ड्याचा तळ व चारही भिंतींवर अस्तराच्या स्वरूपात भातपेंढ्याचा सुमारे 15 सें.मी. जाडीचा थर पसरावा. पेंढा पसरण्यापूर्वी शिफारशीत कीटकनाशक पावडर खड्ड्यात पसरून द्यावी. त्यानंतर खड्ड्याच्या आकारमानानुसार सिल्पॉलीन प्लॅस्टिक अस्तरीत करावे. अस्तरीकरण करताना सिल्पॉलीन प्लॅस्टिक व्यवस्थित पसरावे, जेणेकरून त्यास घड्या पडणार नाहीत. खड्ड्याच्या काठापासून 20 सें.मी. अंतरावर 30 x 30 सें.मी. आकाराचा सभोवताली चर खोदून त्यात सिल्पॉलीनची खड्ड्याबाहेरील वाढीव बाजू गाडून मातीने व्यवस्थित झाकून, माती पायाने व्यवस्थित घट्ट दाबावी व खड्ड्याच्या सभोवताली मातीचा उंचवटा तयार करावा, यामुळे खड्ड्याच्या आजूबाजूने वाहणारे पावसाचे मातीमिश्रित गढूळ पाणी खड्ड्यात न येता खड्डा पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरून राहील.
खड्ड्यामध्ये साठविलेले पाणी पावसाळ्यानंतर उर्वरित काळासाठी (15 नोव्हेंबर ते 15 जून) दहा आंबा किंवा काजू कलमांना प्रति आठवड्यास प्रति झाडास दहा लिटर या प्रमाणात पुरेसे होते. सिल्पॉलीन अस्तरीत खड्ड्यातील पाण्याचा बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी बांबूच्या पट्ट्या आणि गवत वापरून तयार केलेल्या सलद्याने खड्डा झाकून ठेवावा, यामुळे मोकाट गुरे किंवा वन्यप्राणीदेखील तळ्यातील पाणी पिणार नाहीत. प्रत्येक वेळी कलमांना देण्यासाठी खड्ड्यातील पाणी काढल्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर 100 मि.लि. नीम / उंडी तेल ओतावे. अशा तेलाच्या तवंगामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा ऱ्हास मर्यादित राहतो आणि तेलाच्या उग्र वासामुळे, तसेच कीटकनाशक गुणधर्मामुळे मोकाट गुरे पाणी पीत नाहीत आणि उंदीर, सरडा, विंचू इत्यादी पाण्याजवळ जात नाहीत.
संपर्क : 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/9/2023
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक...
अननस लागवडीसाठी क्यू, क्वीन या बिगरकाट्याच्या जात...
या विभागात आच्छादन गृहाचे उपयोग आणि त्यांची रचना क...