जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आपल्या विविध प्रयोगशिल उपक्रमांमुळे आज शेती क्षेत्रात क्रांती करीत आहे. त्यात नवनवीन तंत्रज्ञान व त्याला कल्पकतेची जोड दिली जात आहे. आत्मविश्वास, कठोर परिश्रम व तंत्रज्ञानाच्या जोरावर मातीतून मोती पिकविण्याची किमया व्याहाळी येथील युवा शेतकऱ्यांने साकार केली आहे.
सिरसगाव येथून 3 कि.मी. अंतरावर व्याहाळी नावाचे गाव असून तेथील शेतकरी पंकज दादाराव भोकरे यांचेजवळ वडीलोपार्जीत 30 एकर शेती आहे. गेल्या 5 वर्षाआधी त्यांचे शेतात हजारो रुपये खर्च करुन अल्प उत्पन्न होत होते. परंतु पंकजने इतर क्षेत्राकडे न वळता हवामानावर आधारीत कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने नव्या पध्दतीने शेती करायला सुरवात केली आहे. कमी खर्चात लाखो रुपयाचे उत्पन्न शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा पूर्वापार चालत आलेला समज खरा करून दाखविला आहे. त्यांनी आपल्या गावालगतच्या चार एकर शेतात पपई, दोन एकरामध्ये हळद, सहा एकरामध्ये कापूस तर बाकी जागेमध्ये सोयाबीन, तुर, हरबरा पेरुन प्रति एकरामध्ये 10 ते 15 क्विंटल उत्पादन घेतले आहे. याकरिता ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. त्यांचेकडे 15 जनावरे असून त्यांचेकरिता खाद्य म्हणून अकरा एकरामध्ये नेपिअर अमेरिकन बियानं शेतात टाकून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली आहे.
याचवेळी पंकज भोकरे यांनी गावालगतच्या शेतात पपईची लागवड केली. त्यांना याकरिता नांगरणी, सऱ्या पाडणे, रासायनिक खते, औषधी, रोप लागवड, शेणखताचा एकूण खर्च एक लाख ऐंशी हजार आला. पण यावर्षी मार्केंटमध्ये प्रथम पपईला 4500 रुपये भाव मिळाल्याने 180 टनाला सहालाख तीस हजार रुपये प्राप्त झाले. म्हणजे चार लाखापेक्षा जास्त निव्वळ नफा पंकज भोकरे यांना मिळाला आहे.
शेती व्यवस्थापन, नियोजन, बियाण्यांची निवड, त्यानंतर शेतातील पिकांचे व फळांचे रक्षण करताना अडीअडचणींचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी सर्व बाबींवर मात करून सोयाबीन, तुर, हरबरा, हळद, पपई, कापसाचे विक्रमी उत्पादन घेऊन लाखो रुपयांचा निव्वळ नफा कमवून विदर्भातील तमाम शेतकऱ्यांचे व कृषी तज्ज्ञांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या समस्येचे रडगाणे न गाता व कोणावरही विसंबून न राहता हवामानाशी निगडीत राहून नव्या जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय निष्ठेने करावा, अशी पंकज भोकरे या युवा शेतकऱ्याची खात्री आहे.
लेखक : मंगेश वरकड, प्र.जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/4/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...