महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विविध स्वरुपाचे पुरस्कार देऊन गौरव करीत असते. त्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांच्या पुरस्कारांचा दर्जाही मोठा असतो. त्यामुळे ज्यांचा गौरव केला जातो ते पुरस्कार स्वीकारताना हा आपल्या राज्यातील जनतेच्या सरकारचा गौरव समजून स्वीकारतात. राज्यातील युवकांना त्यांच्या तरुण वयात समाज सेवेसाठी प्रोत्साहन मिळावे. युवकांना सामाजिक हिताची कामे करण्याची गोडी लागावी व सामजिक जडणघडणीतील त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या कामाचे कौतुक करावे अशा उद्देशाने राज्य शासनाने राज्य आणि जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे.
राज्य पुरस्काराचे स्वरुप
राज्यस्तरावरील युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एका युवक-युवती आणि एका नोंदणीकृत संस्थेस देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरुप –गौरवपत्र, सन्मानचिन्ह, युवक/युवतीस प्रत्येकी 50 हजार रुपये रोख पुरस्कार आणि संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, एक लाख रुपये रोख पुरस्कार असे असणार आहे.अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशीलपणे कार्यरत राहण्याचे हमी पत्र देणे आवश्यक आहे.
संस्थेसाठी पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत.
या निकषात प्रामुख्यानं संस्थानी त्यांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त नियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार नोंदणीकृत असावी.
अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.
अर्जदार संस्था/ युवक-युवतीने पोलीसाने प्रमाणित केलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र संबंधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडून घेणे आवश्यक आहे.
निवड समिती
जिल्हा पुरस्काराच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असणार आहेत. क्रीडा उपसंचालक हे सहअध्यक्ष, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती, जिल्हा पुरस्कार प्राप्त दोन व्यक्ती, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक सदस्य असतील. तर जिल्हा क्रीडा अधिकारी हे सदस्य सचिव असतात.
राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री अध्यक्ष असणार असून राज्यमंत्री उपाध्यक्ष व सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव असतील.
युवा विकास कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील गेल्या तीन वर्षात केलेल्या कार्याची कामगिरी या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाईल.
युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात केलेले सामाजिक कार्य राज्यांचे संपत्ती जतन, संवर्धन आणि उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे असावे.
तसेच समाजातील दुर्बल घटक,अनुसूचित जाती, जमाती आणि जनजाती,आदिवासी भागात केलेले कार्य असावे.
शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसायिक, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण हत्या थांबणे, व्यसन मुक्ती याशिवाय युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य असावे. पुरस्काराची माहिती https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यशवंत भंडारे जिल्हा माहिती अधिकारी,जालना
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 4/28/2020
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बह...
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप.
१९७० साली आयुर्वेद मंडळातर्फे मुंबईत साजऱ्या झालेल...
विविध प्रकारच्या खेळांत व क्रीडांत प्रतिवर्षी सर्व...