मुद्रा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे अमरावती येथील खानावळ व्यावसायिकाला आधार मिळाला आहे. अाज वाचूया अमरावतीच्या जगदीश कुर्यवंशी यांची ही यशकथा..
अमरावतीमधील खापर्डे बगीचा येथील रहिवाशी जगदीश मुन्नालाल कुर्यवंशी यांचे सुरुवातीपासूनच छोटे चहाचे दुकान होते. कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. छोट्याशा दुकानावर उदरनिर्वाह यथातथाच चालू होता. अनेक अडचणींवर मात करून हातमजुरी करुन श्री.कुर्यवंशी कुटुंबियांचे पालनपोषण करीत होते. वाढत्या महागाईत मुलींचे शिक्षण कसे करायचे, अशी चिंता जगदीश कुर्यवंशी यांना लागून राहिली होती.
चहाच्या दुकानावरची मिळकत जेमतेम होती. अशा काळात नवा काहीतरी उद्योग सुरू होणे आवश्यक होते. या काळात भांडवल उभारायचे तरी कुठून, असाही प्रश्न कुर्यवंशींपुढे होता. कुठून मदत मिळण्याची आसही त्यांना नव्हती. मात्र, एक दिवस अशाच विचारात असताना त्यांनी दूरदर्शन वाहिनीवर मुद्रा योजनेची माहिती पाहिली आणि त्यांची योजनेविषयीची उत्सुकता वाढली. त्यांनी सरळ बँकेमध्ये जाऊन चौकशी करायचे ठरवले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या जवळच्या शाखेत त्यांचे खाते असल्यामुळे त्यांनी त्या बँकेत जाऊन मुद्रा योजनेसंदर्भात चौकशी केली. त्यावेळी बँकेचे मॅनेजर श्री. गवांदे यांनी त्यांना अत्यंत आस्थेने सर्व माहिती दिली. मग जगदीश कुर्यवंशी यांनी घरगुती मेस व चहा कॅन्टीनसाठी कर्ज मिळण्याबाबत अर्ज केला. दोन दिवसानंतर योग्य ती कागदपत्रे बँकेमध्ये सादर केली. कागदपत्रानुसार बँकेने घराच्या व दुकानाच्या जागेचे सर्वेक्षण केले. आठ दिवसांनंतर त्यांना 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर होऊन मिळालेसुद्धा.
कुर्यवंशी यांनी या पैशातून मेस व दुकानात आणखी काही वस्तू व सेवा सुरू केल्या. त्यामुळे ग्राहकांना आधी ज्या सुविधा मिळत नव्हत्या, त्या मिळायला लागल्या. ग्राहकांची वर्दळ वाढत गेली. बऱ्यापैकी पैसा हाती खेळायला लागला. आजमितीला त्यांचे दुकान सुरळीतपणे चालत आहे.
गरीबीत राहूनही कुर्यवंशी हे आपल्या एका मुलीला शिक्षिकेचे तर एकीला इंजिनिअरिंगचे शिक्षण देत आहेत. त्यांच्या स्वप्नांना मुद्रा योजनेने बळ दिले आहे. माझ्या सारख्या आणखी गोर-गरिबांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणतात.
- वैशाली देशमुख, भाग्यश्री कविटकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/8/2019