जळगांव जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासनाने 13 गावांसाठी महाजल योजना सन 2006-2007 मध्ये मंजूर केली होती. त्यापैकीच एक ग्रामपंचायत विवरे बुद्रुक ( ता.रावेर ) होय. सदरच्या योजनेतून विवरे गावाला शासनाकडून 46 लाखाचा निधी प्राप्त झाला होता व त्या निधीचे योग्य नियोजन करुन विवरे गावाचा पुढील 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न कामस्वरुपी सोडविण्यात आला.
सन 2006-2007मध्ये महाजल योजनेतून प्राप्त निधीचा वापर करुन ग्रामपंचायतीने नांदुरखेडयाजवळ जागा विकत घेतली. कारण विवरे परिसरातील भूगर्भात पाण्याचे स्त्रोत नव्हते. त्यामुळे विवरे ग्रामपंचायतीने नांदुरखेडा येथे जागा घेतली. प्रारंभी विवरे ग्रामपंचायतीने शासनाचा 46 लाखाचा निधी मंजूर होण्यासाठी 10 टक्के स्वनिधी शासकनाकडे जमा केल्यानंतर शासनाने सदरची योजना राबविण्यासाठी अनुदान दिले.
नांदुरखेडा येथे दोन कूपनलिका घेण्यात आल्या व तेथे पंप शेड उभारला जाऊन पंपस्टेशन ते विवरे गाव अशी साडेसहा किलामीटरची पाईपलाईन टाकण्यात आली.व गावांमध्ये जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले परंतु यावेळीच कंत्राटदाराने कामाचे दर वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंत्राटदाराकडील काम काढून घेऊन सदरचे काम स्वत:च करण्याचा निर्णय घेतला.
सदरच्या पाणी पुरवठा योजनेचे सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रमस्थांनी योग्य नियोजन करुन योजनेची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रथम गावामधील जुन्या सिमेंटच्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकल्या. त्यामुळे अनाधिकृत गळ कनेक्शन बंद झाले. व्हॉल्वची संख्या कमी करुन पाणी पुरवठा समप्रमाणात होईल याची काळजी घेतली. जुने दोन जलकुंभ व नवीन जलकुंभ एकमेकांना पाईप टाकून मांडण्यात आले. नवीन जलकुंभाची पाणी साठवण क्षमता 2 लाख लिटर आहे. यातून सर्व गावाला सुरक्षित, समप्रमाणात व उच्च दाबाने पाणी पुरवठा सुरु झाल्याने ग्रामस्थ ही समाधानी आहेत.
विवरे गावाने महाजल योजना योग्य नियोजन व पारदर्शक पणे राबवून गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविला आहे. यामुळे शासकीय निधीचा काटेकोरपणे वापर करुन सदरची योजना विवरे गावाने मार्गी लावली असल्याने विवरा महाजल योजना जिल्हयातील इतर टंचाईग्रस्त गावांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
अंतिम सुधारित : 6/3/2020