'गवारा' या नावाचा एक लहान प्रकार (व्हिरोजा) रानात आढळतो; त्याच्या बिया विषारी व मादक असतात. आबईच्या शेंगा व बिया खाद्य, पौष्टिक, क्षुधावर्धक असून त्यात अ जीवनसत्त्व असते. ताज्या कच्च्या बिया फार खाल्यास उदरविकार, ð अंडवृद्धी, पोटशूल (पोटात होणाऱ्या वेदना) वगैरे विकार होतात. शेंगा लोणच्यात घालतात. दाह, पित्तप्रकोप, जखमा इत्यादींवर उपयुक्त;यकृतापवृद्धीवर मूळ गोमूत्रात उगाळून ७ दिवस रोज घेतल्यास गुणकारी. भाजलेल्या बिया कॉफीऐवजी वापरतात.
आबई हे शेंगभाज्यांच्या वर्गातील पीक आहे. त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. ते बहुधा शेताच्या कुंपणाच्या कडेला किंवा बंगल्याच्या आवाराच्या कुंपणाच्या कडेने लावतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत आळी तयार करतात. त्यांच्यात प्रत्येकी दोन दोन बिया लावतात. पुढे त्यांचे वेल आपणहून कुंपणावर चढून पसरतात. हे वेल दोन एक वर्षे टिकून शेंगा देतात. लागणीपासून चार महिन्यांनी फुले येऊन नंतर दीड दोन महिन्यांच भाजीयोग्य शेंगा तयार होतात. कोवळ्या शेंगांचीच भाजी करतात.
लेखक: भोसले, रा. जि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/25/2020
वनस्पती औषधाकरिता वापरात आहे