অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विस्मरण विकार


स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आपल्या समाजात येत आहे. वाढते वय आणि वृध्दांची संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजाराने अनेक व्यक्ती एक प्रकारे अपंग होतात. हळूहळू दैनंदिन व्यवहार करणेही अवघड व्हायला लागते. या विकारामागे काही वेगवेगळी कारणे आहेत.

रक्तप्रवाह कमी झाल्याने विस्मरण

उतारवयात मेंदूचा रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो. एकूणच शरीरात रक्तवाहिन्या अरुंद होत असतात, त्यात छोटे मोठे अडथळे येत राहतात, सूक्ष्म रक्तस्राव होत राहतात. शरीरात अनेक इंद्रियात यामुळे बिघाड होतात. मात्र मेंदूत रक्तप्रवाहातले अडथळे खूप नुकसानकारक असतात. मेंदूत विशिष्ट कामासाठी विशिष्ट जागा ठरलेल्या असतात. याच कारणाने पक्षाघातही होतो. मात्र पक्षाघातासाठी अचानक मोठा अडथळा कारणीभूत ठरतो. विस्मरण व मानसिक क्षीणता अनेक सूक्ष्म अडथळयांमुळे येते. अल्झायमरचा विकार हा विकार उतारवयातच येतो. यामध्ये विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्ये न बोलता येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे, आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते. वाक्यरचना तुटक होते आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढेपुढे दैनंदिन व्यवहार - खाणे, पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टीपण अवघड होत जातात. हळूहळू व्यक्ती परावलंबी होतात. या आजारात साधारणपणे आठ प्रकारे बौध्दिक कमतरता निर्माण होतात. स्मरणशक्ती कमी होते. भाषाकौशल्य कमी होते लक्ष (ध्यान नसणे) समज कमी होत जाते. रचनात्मक बुध्दीकौशल्ये कमी होतात. भान-स्थळ, काळ,ओळख कमी होते. समस्या-सोडवणुकीची क्षमता कमी होते. कार्य-कुशलता कमी होते. शेवटी शेवटी असा माणूस पूर्णपणे मनविरहीत आणि परावलंबी होतो. ही परिस्थिती घरात सर्वांनाच दु:ख व पीडादायक असते. निदान झाल्यानंतर साधारणपणे 7-8 वर्षात मृत्यू येतो. या विकाराचे मुख्य कारण म्हणजे मेंदू आकसत जातो व अकार्यक्षम होतो. मेंदूतले सूक्ष्म तंतू एकमेकात गुंतून जाळी तयार होतात. मेंदूत एका सदोष प्रथिनाचे प्रमाण वाढत जाते. रक्तवाहिन्यांमध्ये देखील थर जमायला लागतात. यामुळे रक्तप्रवाहाची कुचंबणा होते.

अल्झायमर प्रतिबंध

या आजाराबद्दल संशोधनाने थोडी थोडी माहिती उपलब्ध होत आहे. काही प्रतिबंधक मुद्दे माहीत झाले आहेत ते पुढीलप्रमाणे 1. आहारात गंजरोधक पदार्थ (फळे, भाजीपाला, मासे, योग्य तेले आणि रेड वाईन) असण्याने काही प्रमाणात आजार टळतो किंवा पुढे ढकलला जातो. जिरे आणि हळद ही या दृष्टीने उपकारक ठरतात असे दिसते. 2. मधुमेह, अतिरक्तदाब, रक्तात कोलेस्टेरॉलचे जास्त प्रमाण, धूम्रपान हे सर्व या आजाराची शक्यता वाढवतात. या आजारांचा प्रतिबंध करायला पाहिजे. 3. सौम्य प्रमाणात ऍस्पिरिनचा वापर उपकारक असेल असे दिसते. यामुळे हा आजार होणे टळते किंवा लांबणीवर पडते. 4. बौध्दिक खेळाने (उदा. बुध्दिबळ, शब्दकोडी) या आजाराचा काही प्रमाणात प्रतिबंध होतो असे दिसून आले आहे. तसेच संगीत, सामाजिक कार्यक्रमात सहभाग, द्विभाषिक व्यवहार, इ. मुळे आजाराचा थोडयाफार प्रमाणात प्रतिबंध होतो. 5. काही धातू व रसायनांमुळे हा आजार संभवतो असे दिसते. स्वयंपाकात अधिक अल्युमिनियमचा वापर (विशेषत: तवा, कढई) या दृष्टीने घातक आहे. रंगात वापरली जाणारी सॉल्वंट रसायनेही या आजाराला आमंत्रण देतात असे दिसते. भारतात या आजारावर योगासने, प्राणायाम, ब्राह्मी वनस्पती यावर प्रयोग चालू आहे.

व्यवस्थापन

या आजारावर नक्की औषधे अद्याप मिळालेली नाहीत. काही औषधांचा वापर केला जातो, पण उपयोग मर्यादित आहे. याशिवाय काही मानसोपचारांचा अभ्यास चालू आहे. घरातल्या इतर व्यक्तींवर या आजारी माणसाची विशेष जबाबदारी येऊन पडते. सुरक्षितता : आजूबाजूची खोली, वस्तू, व्यवहार सुरक्षित होतील अशी काळजी घ्यायला पाहिजे, उदा. चालताना खाली पायात अडथळा येणा-या वस्तू-रचना काढून टाकणे,इ. काही वेळेला या व्यक्तीवर मुद्दाम बंधनेही घालावी लागतात. आहार : ब-याच रुग्णांना अन्न भरवावे लागते. काही रुग्ण गिळू शकत नाहीत. त्यांना टयूब नळी घालावी लागते. या नळीतून अन्न द्यावे लागते. या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा प्रशिक्षित व्यक्ती मदतनीस म्हणून लागतात. स्वच्छता : डोळे, तोंड व दात, नाक, त्वचा, जखमा, इ. ची स्वच्छता सांभाळायला लागते. या गोष्टी रुग्णाला करून द्याव्या लागतात. लघवी : अंथरुणात किंवा अवेळी नकळत लघवी होणे ही एक मोठीच समस्या असते. यासाठी थोडे नियोजन करावे लागते. द्रवपदार्थ-पाणी देण्याचे प्रमाण व वेळा, लघवीला नेऊन आणणे किंवा भांडे देणे, नळी घालून ठेवणे हे काही उपाय शिकावे लागतात.

मनोविकारांबरोबर येणारे विस्मरण विकार

गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांबरोबर स्मृतिभ्रंश (विस्मरण-विकार) येऊ शकतो. विशेषत: अतिनैराश्य किंवा वेड लागणे, इ. विकारात हाही विकार दिसून येतो. उतारवयात येणा-या विस्मृती-विकारापेक्षा याची लक्षणे वेगळी असतात. याचा वयोगट पण बराच आधी म्हणजे तरुणवयात सुरु होतो.

मद्यपानामुळे येणारे विस्मृतीविकार

मद्यपि, व्यसनाधीन व्यक्तीच्या शरीरात ब जीवनसत्त्व (थायमिन) कमतरता निर्माण होते. त्वचा काळपट होणे, यकृत खराब होणे याबरोबरच मानसिक क्षीणता व विस्मृतीविकार वाढायला लागतो. या आजाराची एक प्रमुख खूण म्हणजे चालण्यात येणारा असमतोल. या विकारात खूप पूर्वीची स्मृती टिकून राहते पण नुकत्याच झालेल्या गोष्टी विसरल्या जातात. याबरोबरच एकूण गोंधळलेपण, अलिप्तता, असमंजसपणा, इ. बदल दिसतात. ब जीवनसत्त्वापैकी थायमिन औषधाची मात्रा देऊन या आजारात सुधारणा होऊ शकते. याशिवाय इतर अनेक आजारांमुळे विस्मृतीविकार होतो. यांची यादी खूपच मोठी आहे,पण काही उदाहरणे म्हणजे - मेंदूत रक्तस्त्राव, सिफिलिस-गरमी, मेंदूत गाठी, मेंदूसूज,मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, फिट, अपस्मार-मिरगी, लकवा, इत्यादी.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate