भक्तीचे सौंदर्य आणि सामर्थ्य !
सावळ्या विठुरायाच्या पंढरीकडे जाणारे सारे रस्ते हरीभक्तांनी ओसंडून वहात आहेत. असंख्य हाल अपेष्टा सहन करुन, मैलोन मैल पायपीट करीत ही मंडळी पंढरीच्या दिशेने काय मिळवण्यासाठी धावत असतील ? वारी मार्गावर जिथे पडाव असेल तिथे वावरात कडब्याच्या पेंढ्या पडाव्यात तसे वारकरी पडलेले दिसतात. खाली ओबडधोबड जमीन आणि दगड उशाला. तरीही स्वर्गीय सुखाचा आनंद घेतात वारकरी. पिठलं-भात, आमटी-भाकरीच्या सात्विक भोजनाची लज्जत चाखायला, टाळ-मृदंगाच्या ब्रम्हानंदात तल्लीन व्हायला आकाशीचे देवही येत असतील का ? चंद्रभागेच्या वाळवंटी पोहोचल्या नंतर वारकर्यांच्या चेहर्यांवर जो अवर्णनीय आनंद विलसतो तो कुठले घबाड मिळाल्याचा आनंद असतो ? लाखो वारकर्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत असतात. कळसाला दुरुनच हात जोडतात, स्वत:भोवती प्रदक्षिणा घालतात आणि आपापल्या गावी परततात. काय घेऊन येत असतील ही मंडळी ?
एकदा ज्ञानदेवाने नामदेवाला विचारले, "यात्रेला येतोस का ?" नामदेवाने म्हटले, " यात्रा ? कशाला ?" ज्ञानदेव म्हणाले, "साधुसंतांच्या भेटीगाठी होतील." नामदेव म्हणाला, "देवाला विचारुन येतो." नामदेव देवळात जाऊन देवासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागाले. देवाच्या त्या समचरणांकडे तो पाहात राहिला. शेवटी रडत रडत त्याने विचारले, "देवा, जाऊ का मी ?" ज्ञानदेव जवळच होते. या नामदेवाला का आपण वेडा म्हणणार ? बायको माहेरी गेली म्हणून किंवा जातच नाही म्हणून रडणारे माझ्यासारखे पुष्कळ असतील. परंतु देवाजवळ रडणारा भक्त सकाम असला तरी तो असामान्य आहे. मनुष्य कोणाकडे जातो, कोणाजवळ मागतो, हे महत्वाचे असते. जगापुढे तोंड न वेंगाडता देवाला आळविण्याची वृत्ती महत्वाची असते. देवाचे स्मरण करणारा बावळा जीवही विश्ववंद्द ठरतो. भक्तीच्या मंदीरात एकदा या म्हणजे तेथील सौंदर्य, सामर्थ्य समजेल.
कुणाच्याही भक्तीची चेष्टा करु नये, कारण आपली तेवढी योग्यता नसते. आणि योग्यता असणारा, भक्ताचीच काय, कुणाचीही चेष्टा करत नाही.
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
९७६३६२१८५६
अंतिम सुधारित : 1/28/2020