महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न व पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करून खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी-ग्राहक बाजार व कंत्राटी शेती यांची तरतूद करण्यात आली आहे. नुकतेच या अधिनियमामध्ये बदल करण्यात येऊन फळे व भाजीपाल्यांच्या व्यवहाराचे बाजार समितीचे अधिकार बाजार आवारापुरते मर्यादित केले असून त्यात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. संपूर्ण जगात शेतकरी बाजार लावण्याची प्रथा अस्तित्वात असून महाराष्ट्रातही शेतकरी बाजाराचे आयोजन करून शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा त्यासोबतच ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा अशी संकल्पना राज्यात सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता शेतकरी आठवडे बाजार राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरु केले आहेत.
शेतकरी तसेच ग्रामीण महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादक सहकारी संस्था यांचा शेतमाल त्यांनी पुरस्कृत केलेल्या गटांमार्फत/ प्रतिनिधींमार्फत विक्री, मध्यस्थ नसल्यामुळे ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांस उपलब्ध, मालाची हाताळणी कमी होत असल्याकारणाने सुगीपश्चात नुकसान कमी तसेच मालाचा दर्जा उत्तम राहतो, शेतकरी आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याकारणाने शेतमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन करणे शेतकऱ्यांना शक्य, इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत शेतमालाचे वजन. त्यामुळे ग्राहकांमध्ये वजनाबाबत विश्वास निर्माण करणे, बाजारपेठेचा अंदाज येत असल्याने बाजारात आणावयाच्या मालाबाबत नियोजन करणे शक्य, 100 टक्के रोखीने व्यवहार, कोणत्याही प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता नाही, ग्रामीण भागातील युवकांना चांगल्या अर्थार्जनाचा रोजगार उपलब्ध, वाजवी भावामध्ये ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध होत आहे.
शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांच्यामार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी, कृषी माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणीनंतरच्या होणाऱ्या नुकसानीत मोठी घट, रोख स्वरूपात 100 टक्के मालाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या हातात, आपल्या मालाचा बाजारभाव ठरविण्याचा शेतकऱ्याला अधिकार, अत्यंत कमी शेतमाल विक्री खर्च, ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होते, ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा, थेट विक्रीमुळे मध्यस्थांना मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्याला प्राप्त, बाजारात विक्री होणाऱ्या मालाचा अंदाज आल्याने भाजीपाला शिल्लक रहात नाही.
ताजा स्वच्छ शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध, शेतकरी विक्री करीत असल्याकारणाने मालाच्या प्रतीबाबत खात्री, थेट शेतकऱ्यांशी संवाद होत असल्याकारणाने ग्राहक आपली गरज शेतकऱ्याला सांगू शकतात, थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान, घराजवळ भाजीपाला बाजार पेठ उपलब्ध, भाजीपाला खरेदीचे आठवड्याचे नियोजन करता येते, एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दूध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामीण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध, शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत होत असल्याने ग्राहकांना वजनाबाबत विश्वास आहे.
ठाणे जिल्ह्यात श्री संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजारामध्ये शेतकरी गटामार्फत सप्टेंबर 2017 पर्यंत 2 हजार 960 मेट्रीक टन फळे व भाजीपाल्यांची विक्री झाली. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 18 आठवडी बाजार झाले असून 100 पेक्षा जास्त शेतकरी गट सहभागी झाले आहेत.
सहकार, पणन विभागाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरु केले आहे. शेतकरी आठवडे बाजार शासनाच्या या उपक्रमातून ताजा शेतमाल ग्राहकांना उपलब्ध होत आहे. शासनाच्या या स्तूत्य अभियानाचा शेतकरी व ग्राहक हे नक्कीच लाभ घेत आहेत.
संकलन- विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण भवन, नवी मुंबई.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 1/28/2020