शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकविलेल्या मालाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत त्याला ठराविक रक्कम मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगामात ज्वारी (बागायत), ज्वारी (जिराईत), गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमुग, कांदा आदि पिकांचा समावेश आहे. सन २०१७-१८ च्या रब्बी हंगामात या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी यो योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत १ जानेवारी २०१८ पर्यंत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये प्रती हेक्टरी विमा हप्ता दर व विमा सरंक्षण निश्चित करण्यात आले आहे ते यानुसार आहे. रब्बी ज्वारी (बागायत) 130 रुपयात 26 हजार रुपयांचे विमा संरक्षण, ज्वारी (जिराईत) 360 रुपयात 24 हजार रुपयांचे विमा संरक्षण, गहू (बागायत) 495 रुपयात 33 हजार रुपयांचे विमा संरक्षण, हरभरा 360 रुपयात 24 हजार रुपये, उन्हाळी भुईमुग 184 रुपयात 36 हजार रुपयांचे तर कांदा पीकासाठी 3 हजार रुपयात 60 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
आपल्या तालुक्यातील नजिकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/3/2020