অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतातील जलशक्ती / विदयुत निर्मिती इतिहासाचा मागोवा

भारतातील जलशक्ती / विदयुत निर्मिती इतिहासाचा मागोवा

जगात जलशक्तीचा नोंदलेला पहिला वापर इ.स. 250 साली घड्याळ चालवून झालेला दिसून येतो. यानंतर मात्र मानवाने, उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वापर पिठाची गिरणी, लाकुड मिल, किंवा तत्सम उपकरणे चालविण्यासाठी केला. वॉल्वेरीन खुर्चीच्या कारखान्यात 22 मार्च 1880 साली 16 ब्रशआंर्कचे दिवे चालविण्यासाठी जलशक्तीचा वापर केला आणि खऱ्या अर्थाने विद्युतीय वापरास सुरूवात झाली असे म्हटले जाते.

30 सप्टेंबर 1882 रोजी जगातील पहिला जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवरील, विस्कॉनसीन प्रांतातील अॅपलटन ठिकाणी कार्यान्वित करून झाला. या ठिकाणी 250 बल्ब चालू शकतील इतकी शक्ती निर्माण केली गेली. हा प्रकल्प अॅपलटन कागद कारखान्याचे एच.एफ. रॉजर यांनी उभारला होता. याच्या पाठीमागे थॉमस एडीसन यांच्या न्यूयॉर्क येथील विद्युत निर्मिती प्रकल्पापासून स्फूर्ती होती हाच प्रकल्प नंतर 'दि अॅपलटन एडीसन लाईट कंपनी' म्हणून प्रचलित झाला.

जागतिक स्तरावर

अमेरिकेतील नायगरा धबधबा येथील, जलविद्युत प्रकल्प हा जगातील पहिला मोठा जलविद्युत प्रकल्प समजण्यात येतो व त्याचा अजूनही विद्युत निर्मितीसाठी उपयोग होतो.

भारत व वेस्ट बेंगाल

जलविद्युत प्रकल्पाची भारतात सुरूवात अॅपलटन, अमेरिका येथील 1882 साली उभारण्यात आलेल्या जगातील पहिल्या प्रकल्पाच्या नंतर लवकरच करण्यात आली. 10 नोव्हेंबर 1897 रोजी, दार्जिलिंग शहरापासून 12 कि.मी अंतरावरील 'आर्टा टी इस्टेटच्या' डोंगर पायथ्याला (3600 फूट उंचीवर ) भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. हाच प्रकल्प आशियाखंडातील पहिला जलविद्युत प्रकल्पही समजण्यात येतो. या प्रकल्पाची क्षमता 130 कि.वॉट होती व तो प्रकल्प सिद्रापाँग, दार्जिलिंग शहराच्या जवळ कार्यान्वित करण्यात आला.

पश्चिम बंगाल

दार्जिलिंग शहरापासून 12 कि.मी अंतरावरील 'आर्टा टी इस्टेटच्या' डोंगर पायथ्याला (3600 फूट इंची वर) भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला जलविद्युत प्रकल्प 10 नोव्हेंबर 1897 रोजी उभारण्यात आला. प्रकल्प (130 कि.वॉट क्षमतेचा) सिंद्रापाँग, दार्जिलिंग शहराच्या जवळ कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पाची उभारणी स्थानिक नगरपालिकेने शहरातील विद्युतीकरणासाठी केली होती ही भारतातील पहिली विद्युत कंपनी होती व ती व्यवसायिक तत्वावर सामान्य लोकांना वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आली.

याच प्रयोगातून 'विद्युत - ऊर्जा - पर्व' संपूर्ण भारतीय उपखंडात उदयास आले. याच प्रयोगाद्वारे एका प्रकारची रिव्होल्यूशन 'सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रामध्ये' भारतात निर्माण झाली. नंतरच्या कालावधीत जेव्हा या प्रकल्पास 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 'सिंद्रापाँग जलविद्युत स्टेशन' एक 'ऐतिहासिक विद्युत प्रकल्प' म्हणून शासनाने जाहिर केले. याच प्रकल्पामुळे पश्चिम बंगाल ला भारतातील जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी एकमेव अद्वितीय असे स्थान निर्माण झाले.

कर्नाटक राज्य

पूर्वीच्या म्हैसूर राज्यास झळाली असलेले स्थान 1902 साली सिवासमुद्रम येथील कावेरी नदीच्या, दक्षिण भारतातील प्रभागामध्ये उभारण्यात आलेल्या 3 मेगावॉट जलविद्युत प्रकल्प उभारण्याकारणाने प्राप्त झाले. सगळ्यात जास्त 90 मैल लांबीची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. यांचा उपयोग 'कोलार गोल्ड माईन्स' येथील विद्युत गरजा भागविण्यासाठी करण्यात आला. येथील वाढीव विद्युत्तीय गरजा भागविण्यासाठीच शिमसा येथील 17.2 मे.वॉट शक्तीचा दुसरा प्रकल्प 1938 साली कार्यान्वित करण्यात आला.

जम्मू आणि काश्मीर राज्य

नदी पात्रातील वाळू, वालुरच्या पात्रापुढे काढण्यासाठी विद्युत आधारित ड्रेजर वापरण्यात आला. यासाठी 1907 साली महारा इथे लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. म्हैसूर येथे सिवासमुद्रम प्रकल्पानंतरचा हा देशातील दुसरा प्रकल्प होय.

हिमाचल प्रदेश

राजा भुरीसिंग, स्थानिक राजा यांनी चंबा इथे 1908 साली पहिला जलविद्युत प्रकल्प उभारला यानंतर याच ठिकाणी 1.75 मे. वॉट क्षमतेचा प्रकल्प (3 X 250 + 2 X 500 कि. वॉट) उभारून प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली. याच श्रेणीतील 50 कि. वॉट क्षमतेचा जुब्बल प्रकल्प 1912 साली ब्रिटिशांनी सिमला शहराच्या विद्युतीय गरजा भागविण्यासाठी उभारला. 1933 साली भरमोर येथील प्रकल्पाची उभारणी करून यात भर निर्माण झाली.

रसकट (800 कि. वॉट) हा हिमाचल प्रदेशातील पहिला खाजगी प्रकल्प होय. तसेच टिडॉग (800 कि. वॉट) हा पहिला प्रकल्प स्वयंसेवी संस्थेतर्फे उभारण्यात आला. हिमालयीन प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी पाण्यावर आधारित पीठाच्या गिरणी किंवा तेलाच्या घाणी पूर्वापार चालू असलेल्या दिसतात.

उत्तराखंड प्रदेश

या प्रदेशातील पहिला जलविद्युत प्रकल्प 1914 साली 'गायलोगी' येथे (3 मे.वॅ. क्षमतेचा ) मसुरी शहराला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आला. जलविद्युत प्रकल्पांची राज्यातील खरी सुरूवात विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच 450 कि. वॅ. क्षमतेचे बहाद्राबाद प्रकल्पाने झाली असे म्हणावयास हरकत नाही.

हा प्रकल्प अप्पर गंगा कालव्यावर आधारित होता व त्याची उभारणी हरिद्वार कालवा प्रकल्पाच्या बांधकामाधीन भिमगोडा Headwork उभारणीसाठी लागणाऱ्या विद्युत गरजा भागविण्यासाठी करण्यात आला. यानंतर पाथरी येथे 3 X 6.8 मे.वॅ क्षमतेचा प्रकल्प 1955 - 56 साली कार्यान्वित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रातील जलशक्तीचा प्रयोग औरंगाबाद येथील 17 व्या शतकातील पानचक्कीच्या स्वरूपात दिसून येतो. निजामकालीन तुर्कताझ खान यांनी 1695 साली या पवनचक्कीचा वापर पिठाची गिरणी चालविण्यासाठी केला होता. राज्यातील लघु जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची सुरूवात खाजगी माध्यमातूनच टाटा हायड्रोईलेक्ट्रीक पॉवर सप्लाई कंपनीद्वारे खोपोली इथे 1915 साली 72 मे.वॅ. क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करून झाली.

या खालोखाल 78 मे.वॅ. चे भिवपुरी व भिरा (1922) 300 मे.वॅ. प्रकल्प कार्यान्वित झाले. जवळपास 90 वर्षांनंतर 'वॉईथ सिमेन्स' या जगातील अग्रगण्य संस्थेस याच प्रकल्पाच्या शेजारी नवीन विद्युत ग्रह बांधण्याचे कंत्राट देवून नवीन प्रकल्प ( 3 X 24 मे.वॅ) कार्यान्वित करण्यात येवून पारेषन वाहिनीस जोडण्यात आला.
याच दरम्यान राधानगरी इथे 4.8 मे.वॅ क्षमतेचा लघु जलविद्युत प्रकल्प 1950 साली दुरदर्शी राजश्री शाहू महाराजांनी को. ऑ. धोरणाद्वारे कार्यान्वित करण्यात आला.

किलोवॅट प्रकारातील पहिला प्रकल्प (2 X 50 कि.वॅ) येवतेश्वर सातारा इथे सातारा शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेल्या कास तलावावरील पाणीपुरवठा योजनेवर (1890) आधारित उभारण्यात (1916 साली) आला. याच प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करून (1 X 75 कि. वॅ) क्षमतेचा प्रकल्प जानेवारी 1987 साली कार्यान्वित करण्यात आला. हा प्रकल्प पश्चिम घाटातील प्रदेशात उभारण्यात येवून त्याचा प्रमुख उपयोग मुंबई शहराला (तत्कालीन बॉम्बे) वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आला.

त्यानंतरची कोयना प्रकल्पाची घोडदौड सर्वांना ज्ञात आहेच. महाराष्ट्र राज्याला नदी, नाले, डोंगर पायथा / माथा, पर्वतरांगा इत्यादी यांची ईश्वर देण आहे. अशाच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 1960 मे वॅ एकूण 5 टप्प्यांमध्ये ( 1962 पासून 1999) कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पाचा मुळ उद्देश मुंबई व पुणे येथील शहरे व इंडस्ट्रीज यांच्या विद्युतीय गरजा होय.

टप्पा 1 -

4 X  70 मे. वॅ =  280 मे वॅ   1962

टप्पा 2 -

4 X  80 मे. वॅ =  320 मे वॅ   1967

टप्पा 3 -

4 X  80 मे. वॅ =  320 मे वॅ   1967

टप्पा 4 -

4 X  250 मे. वॅ =  1000  मे वॅ   1999

इतर

2 X  20 मे. वॅ =  40 मे वॅ

आंध्रप्रदेश

श्रीशैलम (1670 मे वॅ) येथे देशातील जमिनीखालील पहिले जलविद्युत गृह उभारण्याचे श्रेय या राज्यास प्राप्त आहे.

तामिळनाडू राज्य

राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प 1932 साली 'पायकारा' उदग्मंडलम अर्थात उटी या प्रेक्षणिय स्थळाजवळ येथे उभारण्यात आला.

केरळ राज्य

1940 साली केरळ राज्यामध्ये पाल्लीवासल इथे (37.5 मे.वॅ) क्षमतेचा प्रकल्प उभारणी करून जलविद्युत प्रकल्पास सुरूवात झाली. या प्रकल्पापासून फक्त अंदाजे 8 कि.मी अंतरावर मुन्नार हे अतिशय प्रेक्षणिय पर्यटन स्थळ आहे. यानंतर जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठीचा सविस्तर अभ्यास श्री. एच. जी. हॉवर्ड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यानंतर सबारीगीरी इथे 1965 साली व इद्क्की इथे 1973 साली जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीच्या मुहूर्तमेढ रोवल्या गेल्या. या घाडामोडी केरळ बोर्डाच्या इतिहासातील Mile stone आहेत.

उत्तर प्रदेश राज्य

1965 साली मातातिला इथे 3 जनित्रे बसवून 10.2 मे.वॅ क्षमतेचा प्रकल्प उभारून राज्यामध्ये जलविद्युत प्रकल्प उभारणीची सुरूवात झाली. हा प्रकल्प बांधलेल्या (1957) धरणावरच उभारणी करण्यात आला. मातातिला प्रकल्प झांसी शहरापासून 60 कि.मी अंतरावर ललीतपूर जिल्ह्यामध्ये मोडतो. हे स्टेशन बेटवा नदीवरील डाव्या बांधावर उभारण्यात आले आहे.

गुजरात राज्य

राज्यातील उकाई नदीवरील उकाई धरणावर जुलै 1974 रोजी जलविद्युत प्रकल्पातील पहिले जनित्र (75 मे .वॅ) कार्यान्वित करण्यात आले. यात पुढे 5 अधिक जनित्रे बसविण्यात आली. या प्रकल्पाची एकूण क्षमता 305 मे.वॅ आहे.

मध्य प्रदेश व राजस्थान

चंबळ नदीवरील राजस्थान व मध्यप्रदेश यांचे सिमेवर धरण बांधण्यात आले. या ठिकाणी एकूण 115 मे. वॅ क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प एकूण 3 टप्प्यांत (1960 ते 1966 कालावधीत) पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पामध्ये राजस्थान व मध्यप्रेदश या दोन्ही राज्यांचा 50 टक्के भाग आहे.

बिहार

कोसी जलविद्युत प्रकल्प (20 मे.वॅ) वाल्मीकीनगर जलविद्युत प्रकल्प (3 X 5 मे. वॅ ) देहरी जलविद्युत प्रकल्प (4 X 1.65 मे.वॅ) सन 1993 बारून लघु जलविद्युत निर्मिती प्रकल्प (2 X 1.65 मे.वॅ) सन 1996 अशा जलविद्युत प्रकल्पांची शृंखलाच राज्यामध्ये उभारण्यात आली.

मेघालय राज्य

सोना - परी (3 X 5 कि.वॅ) लघु जलविद्युत प्रकल्प तत्कालीन कुचबिहार राज्याच्या राणीने 1922 साली कार्यान्वित केला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागला. हा प्रकल्प भारतातील तिसरा तर उत्तरपूर्वेकडील पहिला प्रकल्प मानला जातो. हा प्रकल्प उत्तर पूर्वेकडील मा. प्रेम, शिलाँग च्या मध्यभागात उभारलेला आहे. या प्रकल्पाचा उपयोग शिलाँग येथील शासकिय इमारती व रस्ते यांच्या विद्युतीकरणासाठी केला गेला. हा प्रकल्प जवळपास 60 वर्षे कार्यान्वित होता. परंतु सन 1982 नंतर, हा प्रकल्प जनित्राच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे बंद करण्यात आला.

सिक्कीम

सिक्कमी राज्याच्या इतिहासात प्रथमच 27 मे 1927 रोजी लोअर सिंचे वस्ती इथे रानीखोला नदीवर 50 कि. वॅ क्षमतेचा लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचा मुळ उद्देश गंगटोक येथील राजधानी यांच्या विद्युत गरजा भागविण्यासाठी होता. या प्रकल्पापासून तयार झालेली वीज 3.3 कि.वॅ क्षमतेच्या पारेषण वहिनीद्वारे वितरित करण्यात येत होती. याच प्रकल्पाच्या क्षमतेमध्ये 1935 साली 60 कि.वॅ क्षमतेचे नवीन जनित्र उभारून वाढ करण्यात आली. वाढीव क्षमतेचा वापर विद्युत वितरण व्यवस्था तिबेट रोड इथपर्यंत वाढवून करण्यात आली. जाली जलविद्युत प्रकल्प (6 X 350 कि.वॅ, 2.1 मे.वॅ) 1966 कार्यान्वित करण्यात आला होता. याच प्रकल्पाचे पुनरूज्जीवन 1980 साली करण्यात आले.

अरूणाचल प्रदेश

अरूणाचल प्रदेश जलविद्युत प्रकल्पाच्या क्षमतेमध्ये सर्वात प्रबळ राज्य आहे. राज्याची एकूण क्षमता 27000 मे.वॅ असून देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यामध्ये दिहांग व सुभांश्री विद्युत (21000 मे.वॅ) क्षमतेचा जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. मनीपूर राज्य : मनीपूर राज्यामध्ये लायमाखोंग येथे लघु जलविद्युत प्रकल्प इंम्फाळ शहरापासून 14 कि.मी अंतरावर आहे. त्याप्रमाणे लोकत्तक येथे 105 मे.वॅ (3 X 35 मे.वॅ) क्षमतेचा प्रकल्प 1983 रोजी कार्यान्वित करण्यात आला.

भूतान देश

भूतान देशात थिम्पू येथे 1967 साली 360 कि.वॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला.
क्रमवारीनुसार देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प

टेहरी कॉम्पलेक्स

2400 मे.वॅ

कोयना कॉम्लपलेक्स

1960 मे.वॅ

श्रीशैलम

1670 मे.वॅ

नाथपा झाकरी

1500 मे.वॅ

सरदार सरोवर

1450 मे.वॅ

भाकडा नानगल

1325 मे.वॅ

शरावती कॉम्पलेक्स

1145 मे.वॅ

इंदिरासागर

1000 मे.वॅ

करचम वांगटू

1000 मे.वॅ

कुंदा कॉम्पलेक्स

834 मे.वॅ

नागार्जून सागर

816 मे.वॅ

इदुक्की

780 मे.वॅ

- श्री. ध. श्री. कुलकर्णी

माहिती स्रोत: इंडिया वाटर पोर्टल

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate