অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानवविकास

काही वर्षांपूर्वी लोकसंख्यावाढीचा प्रश्न हाच चर्चेत प्रमुख प्रश्न होता. आधी लोकसंख्यावाढ थांबवा मग पुढचे पाहू असा धोशा असायचा. पण काही जण म्हणायचे की विकास झाला की कुटुंबनियोजन आपोआप होईल. लोकसंख्या-नियोजन आधी की मानवविकास आधी?हा वाद कोंबडे आधी की अंडे असा झडायचा. आता दोन्हीचे महत्त्व सर्वांना मान्य झाले आहे. दोन्हीही पाहिजे, आणि एकत्र पाहिजे हा नवा मंत्र आहे.

लोकसंख्यावाढीची समस्या

सर्व जगातच लोकसंख्या वाढली आहे. या 20 व्या शतकात आधी जगाची लोकसंख्या 165 कोटी होती, ती आता 600 कोटींवर पोचली आहे. भारताची लोकसंख्याच20 कोटीवरून आता 100 कोटीवर पोचली आहे. जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त हात, जास्त डोकी. म्हणजेच जास्त विकास आणि वाढ. असे असले तरी जास्त लोकसंख्या म्हणजे खाणारी तोंडे जास्त हेही खरेच आहे. जास्त लोकसंख्येला लागणार - जास्त अन्न, जळण,घरे, इंधन, रस्ते, शाळा, दवाखाने, औषधे, पिण्याचे पाणी,वाहतूक, शासनयंत्रणा, न्यायालये आणि असंख्य सेवा सुविधा. तसेच यामुळे कचरा, प्रदूषण, गर्दी हे सर्व वाढणार. पृथ्वीवरची जंगले कमी होणार. नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित असते. जमीन, पाणी, जंगल, इंधन हे सर्व मर्यादित आहे. म्हणून लोकसंख्या फार नको. यामुळे कुटुंबनियोजन स्वीकारले गेले. आता बहुतेक कुटुंबात 2-3 मुले-मुली असतात. काही मागास समाजातील कुटुंबात मात्र अजूनही 4-5 मुले-मुली होतात. कुटुंबनियोजनाच्या दृष्टीने आपला चढता प्रवास आता थांबला आहे. तरीही महाराष्ट्राची लोकसंख्यावाढ थांबून स्थिर व्हायला पुढील गोष्टींची गरज आहे. मुलींची लग्ने व प्रथम संतती वय वर्ष18 नंतरच होणे. इतर राज्यांमधून येणा-या लोकांची आवक मर्यादित असणे. त्यासाठी त्या प्रांतांचा विकास होणे आवश्यक आहे. मागास समाजांची व स्त्रियांची आर्थिक, सामाजिक उन्नती होणे. समाजातले 'मुलगा पाहिजेच' हे वेड कमी झाले पाहिजे. कष्टकरी, मागास समाजात आतापर्यंत अनेक सुधारणा झाल्या पण त्या इतर देशांच्या मानाने पुरेशा नाहीत. मानवी विकासाचे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत. त्यातले तीन मानवविकासासाठी हिशेबात घेतात. अ) शिक्षण व समज

महात्मा फुले, महर्षी कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील आदि तपस्वी माणसांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षणाचा प्रकाश पसरला. पण अजूनही कितीतरी मुले-मुली शाळेत जात नाहीत व गळतीही होते. शाळेत जाणा-यांपैकी अनेकांना लिहितावाचता येत नाही. म्हणजेच शिक्षणाचे प्रमाण व गुणवत्ता वाढायला पाहिजे. याचबरोबर प्रौढ साक्षरतासुध्दा वाढायला पाहिजे. भारताचा या बाबतीत जगात 127वा क्रमांक लागतो.

ब) आर्थिक मिळकत भारतात सुमारे 30 % लोक दारिद्रयरेषेखाली जगतात. यातही स्त्रिया जास्त हलाखीचे जीवन जगतात. आबालवृध्दांचे कुपोषण हे त्याचे एक प्रमुख चिन्ह आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुण्याची सुबत्ता सोडल्यास इतर प्रांतांप्रमाणेच गरिबी आहे. क) आयुर्मान जीवनाची गुणवत्ता चांगली असल्याचे एक गमक म्हणजे आयुर्मान - जीवनमान. महाराष्ट्रातल्या माणसाचे सरासरी जीवनमान सुमारे 65 वर्षे आहे. प्रगत देशात ते सुमारे 75असते. आपल्याकडे साधारण मृत्यूदर कमी झालेला असला तरी बालमृत्यूदर 40 च्या घरात असल्यामुळे सरासरी आयुर्मान थोडे कमीच आहे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate