किशोरावस्था हा बाल्यावस्था ते प्रौढावस्था दरम्यानचा संक्रमणाचा काळ आहे. वेगाने होणारे शारिरीक, जीवशास्त्रीय आणि संप्रेरकीय बदलांमुळे, मनो-सामाजिक बदल, वर्तणुकीत बदल आणि लैंगिक परिपक्वता ही या अवस्थेची गुणवैशिष्ट्ये आहेत. जलद गतीने होणाऱ्या वाढीची ही जीवनातील दुसरी अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये मुले आणि मुली वेगवेगळ्या अनुभवातून जात असतात. जीवनाच्या या काळात विविध पोषक घटकांची जास्त गरज निर्माण होते, विशेष करुन लोह.
अपुरे पोषण आणि आहारातील लोहाचा अपुरा पुरवठा यामुळे होणारा रक्तक्षय ही केवळ गर्भवती महिला, नवजात बालके आणि लहान बालकांची समस्या नसून किशोरवयीन मुला-मुलींना सुद्धा भेडसावणारी एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.
भारतामध्ये प्रामुख्याने लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय आढळून येतो आणि ही आपल्या देशासमोरील सर्वात मोठी पोषणविषयक समस्या आहे. एनएफएचएस -३ च्या अहवालानुसार आणि राष्ट्रीय पोषण संनियंत्रण ब्युरो सर्व्हेक्षणानुसार मुलींमध्ये (हिमोग्लोबीन < १२ ग्रॅम टक्के) आणि मुलांमध्ये (हिमोग्लोबीन < १३ ग्रॅम टक्के) रक्तक्षयाचे प्रमाण जास्त आहे.
एनएफएचएस ३ अहवालानुसार किशोरावस्थेतील मुले आणि मुलीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ५५ टक्के पेक्षा जास्त आहे. किशोरवयीन मुलींमध्ये जलदगतीने होणारी शारिरीक वाढ आणि मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे त्यांना रक्तक्षय होण्याची दाट शक्यता असते. एनएफएचएस -३ अहवालानुसार १५-१९ वर्षे वयोगटात असणाऱ्या ५६ टक्के किशोरवयीन मुलींना कुठल्यातरी एका प्रकारचा रक्तक्षय असतो. १५-१९ वर्षे वयोगटातील ३९ टक्क्यांपेक्षा जास्त मुलींना सौम्य, १५ टक्के मुलींना मध्यम तर २ टक्के मुलींना तीव्र स्वरुपाचा रक्तक्षय असतो.
एनएफएचएस -२ नुसार १५-१९ वर्षे वयोगटामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरुपाच्या रक्तक्षयाचे प्रमाण अनुक्रमे ४१ टक्के, १८ टक्के आणि २ टक्के होते. यावरुन रक्तक्षयाच्या समस्येमध्ये फार बदल झाल्याचे दिसत नाही. भारतात सर्वात जास्त रक्तक्षय १२-१३ वर्षे या मुलींमध्ये मासिक पाळी सुरु होण्याच्या कालावधीत दिसून येतो.
लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयामुळे पेशीपर्यंत ऑक्सीजन वाहून नेण्यावर प्रतिकूल परिणाम होऊन शारिरीक क्षमता तसेच कार्यक्षमता कमी होणे, शारिरीक वाढ मंदावणे, बौद्धिक विकास कमी होणे, भौतिक क्षमता कमी होणे तसेच दैनंदिन कामामधील एकाग्रता कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. किशोरवयीन मुलींमधील लोह कमतरता संपूर्ण जीवनचक्र प्रभावित करते. रक्तक्षय झालेल्या मुलींमध्ये प्रसुतीपूर्व लोहाचा साठा कमी असतो आणि वाढणाऱ्या गर्भाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोहाचा साठा निर्माण करण्यासाठी गर्भावस्थेचा कालावधी सुद्धा कमी असतो. रक्तक्षय असणाऱ्या मुलींना अपुऱ्या दिवसांची प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची जोखिम असते.
या किशोरावस्थेतील रक्तक्षय प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध अभ्यास घेण्यात आले आहेत. त्यातील निष्कर्षानुसार, १०० मि.ग्रॅम लोह आणि ५०० मायक्रोग्रॅम फॉलिक ॲसिडच्या गोळीचे साप्ताहिक सेवन रक्तक्षय कमी करण्यामध्ये प्रभावी आहे. या वैज्ञानिक अभ्यासातून प्राप्त निष्कर्षावरुन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारने किशोरवयीन मुला-मुलीसाठी साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पुरवणी योजनेच्या (WIFS) कार्यप्रणालीची रुपरेषा विकसित केली आहे.
वरील दोन्ही गटातील किशोरवयीन मुला-मुलींसाठी IFA गोळ्या (दर आठवड्याला १०० मि.ग्रॅ. लोह आणि ५०० मायक्रो ग्रॅम फॉलिक ॲसिड असलेली एक गोळी याप्रमाणे) सोमवारी मोफत दिल्या जातील. यासोबतच जंतनाशक ॲल्बेंडॅझॉल गोळ्या दर सहा महिन्यांनी दिल्या जातील. या माध्यमातून वर्षातील ५२ आठवडे देखरेखीखाली गोळी खावू घातली जाईल.
रक्तक्षयाची मध्यम, तीव्र अशी वर्गवारी करुन अशा किशोरवयीन मुला- मुलींना आरोग्य संस्थेत संदर्भित करणे, वर्षातून दोनदा सहा महिन्याच्या अंतराने जंतनाशक म्हणून (४०० मि.ग्रॅ. ॲल्बेंडॅझॉल) देणे, आहारात सुधारणा करण्यासाठी आरोग्य शिक्षण व समुपदेशन करणे तसेच आतड्यातील जंत प्रादुर्भावाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य कार्यवाही करणे. रक्तक्षयाचे वर्गीकरण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांना किशोरवयामधील फिक्कटपणा सोबत त्यांची स्वत:ची नखे आणि जीभेच्या रंगाची तुलना करण्याच्या साध्या पद्धतीद्वारे निदान करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
किशोरवयीन मुले- मुली तसेच जनतेमध्ये या कार्यक्रमाचे महत्व पटवून देण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी जसे अंगणवाडी कार्यकर्ती, आशा, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक (महिला / पुरुष), पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, शिक्षक इ. मोलाची भूमिका बजावतील.
या कार्यप्रणालीमुळे किशोरवयीन मुला-मुलींना पुढील तपासणी व उपचारासाठी आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यास मदत होईल. येथे रक्तामधील हिमोग्लोबीन प्रमाणाची तपासणी केली जाईल आणि रक्तक्षय आढळून आल्यास रक्तक्षयावर उपचार केला जाईल. शाळेतील मुलांचे वर्षातून किमान दोनदा हिमोग्लोबीन तपासण्या करता येईल. पुढे जाऊन तरुण होणाऱ्या या वयोगटातील मुलामुलींच्या आरोग्याच्या भक्कम पायाभरणीचा हा कार्यक्रम आहे. त्यात आरोग्यदृष्ट्या जागरुक समाजाने आपले योगदान देणेही अपेक्षित आहे. यामुळे आहार आणि आरोग्यविषयीची जाणीव जागृतीही होण्यास मदत होणार आहे.
संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
स्त्रोत - महान्यूज
अंतिम सुधारित : 8/3/2023
भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 ...
वयात येताना किंवा वयात आल्यानंतरही चेहऱ्यावर मुरूम...
या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक...
किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवाव...