रोज आंघोळ करणे ही खरी तर आपली सांस्कृतिक, पारंपरिक पध्दत आहे. काही ठिकाणी पाण्याच्या अभावाने यावर मर्यादा येतात. पण जेथे शक्य आहे तेथे दैनंदिन आंघोळ हा नियम पाळलाच पाहिजे.
आंघोळीसाठी थंड किंवा गरम पाणी स्वतःच्या सवयीने ठरते. आयुर्वेद थंड पाण्याला जास्त महत्त्व देतो. गरम पाण्याने आंघोळ करणा-याने रोज डोक्यावरून पाणी घेऊ नये. असे केल्यास केसांचे आरोग्य बिघडते.
आंघोळीसाठी साबणाची आवश्यकता नाही. अगदी तेलकट मळ असेल तरच त्याला साबण लागतो. साबणाशिवाय साध्या चोळण्याने स्वच्छता होऊ शकते. काहीजण यासाठी भिजलेला कपडा, बेसन, इत्यादी साधने वापरतात. साबणाच्या अतिवापराने त्त्वचेवरील स्निग्ध पदार्थ जाऊन त्त्वचा कोरडी खरखरीत होते. शिकेकाई, रिठे यांचा वापर विशेषतः केसांसाठी केला जातो. हे पदार्थही रोज लावणे आवश्यक नसते. स्त्रियांच्या लांब केसांमुळे, आणि पाण्याच्या टंचाईमुळे आपल्या देशात स्त्रियांनी रोज डोक्यावरून आंघोळ करण्याची पध्दत नाही. पण डोक्यावरून आंघोळ करणे हे स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे तर आहेच, पण सुखद अनुभवही आहे.
शक्य असेल तेव्हा आंघोळीपूर्वी तेलाने सगळया अंगाला स्वत: मालीश करावे. याने त्त्वचा तुकतुकीत आणि सतेज राहते व शरीराची शक्ती वाढते. तसेच यामुळे अंगदुखी,पाठदुखीसारख्या तक्रारी काही प्रमाणात टळतात
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 5/1/2020