आपल्या देशात शौचानंतर पाण्याने स्वच्छता करण्याची पध्दत रूढ झाली आहे. काही समाजात मलविसर्जनानंतर दगड किंवा झाडाची पाने वापरण्याची पध्दत आहे. ही कोरडी पध्दत अगदी शास्त्रीय आणि योग्य आहे. पाण्याची टंचाई असेल तिथे अशी पध्दत चांगली आहेच. विशेषकरून खड्डा प्रकारच्या संडासात ही पध्दत अगदी चांगली चालू शकते. अशी कोरडी पध्दत टाकून पाणी वापरण्याची पध्दत काही समाजांनी सुरू केली आहे. मात्र हातांची स्वच्छता नीट न राहिल्यास पोटाचे आजार वाढण्याचा संभव असतो. हल्ली ब-याच इंग्रजी बैठकीच्या संडासात (कमोड) पाणी किंवा कागद उपलब्ध असतो. कागद वापरणे हीही एक चांगली पध्दत आहे. यासाठी वेगळा कागद असलेला बरा.
संडासांमध्ये नळाचे पाणी असेल तर 'जेट' पाण्याचा फवारा वापरता येतो. जेट फवा-यामुळे स्वच्छता चांगली होते व हाताचा वापर करावा लागत नाही. मलविसर्जनानंतर पाण्याने हात धुताना साबण किंवा राख वापरून हात स्वच्छ करावेत. असे केले नाही तर मळाचा सूक्ष्म भाग हातावर राहू शकतो. यातून जंतुसंसर्गाची मोठी शक्यता असते. ज्या व्यक्तींना हगवण, कावीळ, विषमज्वर, कॉलरा, जंत, इत्यादी आजार आहेत त्यांच्यापासून या मार्गाने आजार पसरण्याची दाट शक्यता असते. संसर्गाचे हे चक्र थांबवण्यासाठी शौचानंतर व जेवणाआधी हात धुणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवाव...
जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीत...
स्वच्छतेसाठी कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची गरज ना...
बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत...