অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वच्छ विद्यालय पुरस्कार

स्वच्छ विद्यालय पुरस्कार

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ व्हावा, यासाठी दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर 2015 या कालावधील ‘स्वच्छ-विद्यालय- स्वच्छ-महाराष्ट्र’ मोहीम कार्यान्वित करण्यात आली होती. याअंतर्गतच देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ महाराष्ट्र हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराबाबतच्या मार्गदर्शन सूचना, शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाकडून मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवर 100 शाळा, राज्य पातळीवर 40 शाळा आणि जिल्हा पातळीवर 48 शाळा यांची निवड करण्यात येईल. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शाळांनी अपलोड केलेल्या प्रस्तावातील माहितीची प्रत्यक्ष पडताळणी जिल्हा आणि तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येईल. पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा 5 क्षेत्रांमध्ये एकूण 39 घटक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांना श्रेणी देण्यात येणार आहे. या निकषामध्ये 90 ते 100 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना हिरवा रंग, पाच श्रेणी आणि अत्युत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 75 ते 89 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना निळा रंग, चार श्रेणी आणि उत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 51 ते 74 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना पिवळा रंग, तीन श्रेणी आणि उत्तम परंतु सुधारणेस वाव असा शेरा दिला जाणार आहे. 35 ते 50 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना नारंगी रंग, दोन श्रेणी आणि ठीक सुधारणेची गरज असा शेरा दिला जाणार आहे तर 35 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या शाळांना लाल रंग, एक श्रेणी आणि सुधारणेची आत्यंतिक गरज असा शेरा दिला जाणार आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै, 2016 ही कालमर्यादा देण्यात आली आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2016 आहे. अर्ज करताना शाळेचा असलेला युडायस क्रमांक नोंदवून लॉगीन करता येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येणार असून या समितीमध्ये निवडक विस्तार अधिकारी, निवडक केंद्र प्रमुख व निवडक मुख्याध्यापक यांचा समावेश असेल. तालुक्यात काम करणाऱ्या निवडक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना यामध्ये सहभागी होता येईल. स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येत आहे. या समितीमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक), निवडक नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा व स्वच्छता), जिल्हा आरोग्य अधिकारी व निवडक स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांचा समावेश असेल. या पुरस्कारासाठी राज्यस्तरावर प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. समितीमध्ये शिक्षण संचालक (माध्यमिक/प्राथमिक), आरोग्य संचालक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी नियुक्त केलेले दोन नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता, पंचायत राजचे संचालक, नगरपालिका संचालक, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य यांचा समावेश असेल. राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरुन नियुक्त समितीने ज्या शाळा पुरस्कारासाठी अर्ज करतील, त्यांनी सादर केलेल्या माहितीची तपासणी करण्यात येईल. राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर देखील उत्तम कामगिरी करणाऱ्या शाळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत कार्य करणाऱ्या नामांकित उद्योग समुहांना/ संस्थांना सहभागी करुन घेता येणार आहे.

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध प्रश्नावलीनुसार सर्व शाळांना यासाठी अर्ज करता येईल. हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरमधून किंवा 07097298400 या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून डाऊनलोड करता येईल. हा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लेखिका - वर्षा फडके,
विभागीय संपर्क अधिकारी.

 

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate