स्वच्छ भारत अभियानाने सर्वाधिक चालना कुणाला मिळाली असेल तर ती लहान बालकांना. मोठ्यांना कितपत फरक पडतो? हे आपण दैनंदिन जीवनात पाहतोच. पण मुलांच्या संस्कारक्षम मनावर मात्र स्वच्छतेचा संस्कार रुजतोय, हे मात्र नक्की. जिल्हा विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांच्या पाहणी नंतर याची खात्री पटली. ४० व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शहरातील आर.आर. विद्यालयात झाले. यावेळी ‘माझ्या समोर बसलेले हे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत’, अशा शब्दात श्री. खडसे यांनी या बालवैज्ञानिकांचे कौतूक केले.
मुलांचे हे कौतूक त्यांनी सादर केलेल्या प्रयोगांतून सार्थ प्रतित होत होते. श्री. खडसे यांनीही मुलांशी संवाद साधत त्यांनी केलेल्या प्रयोगांची पाहणी केली. या ठिकाणी मांडण्यात आलेल्या प्रयोगांतून बहुतेक मुलांनी 'स्वच्छ भारत'चे स्वप्न साकारण्यासाठी आपली विज्ञान जिज्ञासा कारणी लावली होती. साऱ्या मुलांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार करुन कचरा निर्मूलन या विषयावर सादरीकरण केले होते. या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाला हातभार कसा लागेल? याचाच विचार केलेला दिसत होता. माणसाचा अधिवास हा अधिकाधिक पर्यावरणपूरक कसा असू शकतो, त्यातून पर्यावरण संरक्षण, परिसर स्वच्छता साध्य होऊन, मानवी जीवन अधिक सुकर कसे होऊ शकते, स्थानिक संसाधनांचाच वापर त्यासाठी कसा होऊ शकतो? याची प्रात्यक्षिकासह मांडणी पाहून मुलांच्या प्रतिभेचे मनोमन कौतूक वाटत होते.
सार्वजनिक स्वच्छतेसारख्या यक्ष प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा वापर करुन ऊर्जा निर्मिती, खत निर्मिती, वस्तूंचा पुनर्वापर यासारखे अनेक कल्पक पर्याय विद्यार्थ्यांनी सादर केले होते. कचरा निर्मूलन होऊन स्वच्छ भारत अभियानासाठी आपले योगदान देण्याचा विद्यार्थ्यांचा पर्याय खरोखरीच स्तुत्य होता. ऊर्जा, अन्न निर्मिती, शेती अशा जीवनाशी निगडीत विविध प्रश्नांची सोडवणूक मुलांनी आपल्या प्रयोगातून केली होती. त्यांची प्रतिभा जेवढी थक्क करणारी होती, तेवढीच त्यांची सामाजिक जाणीवही अंतर्मुख करायला लावणारी होती. ‘लहान मुले आपल्या (मोठ्यांच्या) कल्पनेपलिकडे जाऊन विचार करतात’, असे जे श्री. खडसेंनी या बाल वैज्ञानिकांबद्दल म्हटले ते किती खरे होते याची प्रचिती वारंवार येत होती. कचरारुपी राक्षसाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी कल्पकतेने विज्ञानाचे अस्त्र उपसले होते. देशापुढील समस्यांचा विचार करुन त्यावर प्रत्यक्ष कृतीद्वारे उत्तर शोधण्यासाठी आपली प्रतिभा पणाला लावणाऱ्या या बाल वैज्ञानिकांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे.
-मिलिंद मधुकर दुसानेमाहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.