स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकून राहायचे असेल तर वाचन हे अत्यंत महत्वाचे. व्यक्तीला अनुभवाचे ज्ञानाचे बोल पुस्तक सांगत असतात त्याचा उपयोग आयुष्यात केला तर सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यात आपणास कोणीच रोखू शकत नाही. आयुष्यातला महत्वाचा काळ हा विद्यार्थी असतानाचा असतो. यावेळी शिक्षणाचा एक अविभाज्य भाग म्हणजे वाचन. जो विद्यार्थी अभ्यासाबरोबरच इतर पुस्तकाचे वाचन करतो त्याचे विशेष प्राविण्य विविध क्षेत्रात दिसून येते. आजचा विद्यार्थी ज्ञानसंपन्न व्हावा यासाठी शासन देखील विविध उपक्रम राबवत आहे. यात वाचक मेळावे, साहित्य संमेलन, ग्रंथोत्सव , यांच आयोजन केले जात आहे. नुकतेच राज्यातील नांदेड जिल्ह्यात ʿशाळा दत्तक योजनाʾ ही जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाविषयी...
नांदेड जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांनी आपल्या वाचनालयातील ग्रंथ आपल्या गावातील / परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना नि:शुल्क वाचण्यासाठी देणे म्हणजे एक प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क वाचन सेवा पुरविणे असे या शाळा दत्तक योजनेचे स्वरुप आहे.
शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून भविष्यातील उत्तम नागरिक घडविणे तसेच सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथाना हक्काचा व नियमित वाचक वर्ग उपलब्ध करुन देणे ही आमची भूमिका असणार आहे. यातून एकूणच वाचन संस्कृती रुजविणे तिचे संगोपन करणे व ती वृद्धिंगत करणे हा या योजनेमागचा उद्देश म्हणता येईल. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य वाचनालयातील ग्रंथपाल आणि आठवड्यातून ठराविक एका दिवशी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये जाऊन वाचन करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथ वितरित करण्यात येणार आहेत. सदर ग्रंथाची स्वतंत्र देवघेव नोंदवही करण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र खाते / पान करुन त्यावर त्यांच्या ग्रंथाची नोंद केली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात मागील ग्रंथ वाचून झाल्यानंतर तो परत करुन पुन्हा नवीन ग्रंथ वाचावयास नेता येणार आहे.
या योजनेमध्ये शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन करण्याची गोडी सहजपणे निर्माण करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांकरिता वाचनसंस्कृतीस पोषक असे विविध प्रकारचे कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन करणे ज्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल व त्यांना वाचनाची गोडी लागेल. सोबतच शिक्षकांनासुध्दा त्याच्या आवडीचे ग्रंथ पुरविण्यात येतील. तसेच पालकांनासुध्दा संबंधित वाचनालयाचे सभासदत्व स्वीकारुन वाचन सेवा पुरविण्यात येईल. झालेल्या वाचनाचा प्रभाव बघण्यासाठी वाचनावर आधारित स्पर्धा घेण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना मिळू शकतो.
या योजनेतंर्गत वाचक गट हा शालेय विद्यार्थी असल्यामूळे त्यांना गोष्टीरुप, चित्ररुप, चरित्रमय, प्रबोधनपर, ज्ञानविज्ञान, सामान्यज्ञान इ. प्रकारचे ग्रंथ पुरविण्यात येतील. जेणेकरुन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे पुस्तके मिळतील आणि विविधतेतून वाचनाचे उद्दिष्ट साध्य होईल. योजनेंतर्गत शाळांना वाचनसेवा पुरविणारे बहुतांश ग्रंथालये हे ग्रामीण भागातील असल्यामुळे या भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ सहजपणे घेता येईल. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नक्कीच रुंदावतील. मनुष्य शिक्षणाने शिक्षित होतो परंतू वाचन केल्याने तो सुसंस्कृत होतो, त्याच्या जाणिवा समृद्ध होऊन वाचनाने त्याच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते.
एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वाचन अत्यंत सहायक ठरते. यासाठी शिक्षकांनी व पालकांनी स्वत: वाचन करणे आवश्यक असून आपल्या विद्यार्थ्यांना व पाल्यांना वाचनाचे महत्व पटवून देणे व त्यांच्यामध्ये अभ्यासाशिवाय अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे सुनील हुसे सांगतात. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाचेल तोच टिकेल, असं म्हणणे योग्य ठरेल.
लेखिका: मीरा ढास-काळकुटे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/18/2020