অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुष्काळी कर्जत-जामखेड तालुके झाले टॅंकरमुक्त, जलयुक्तची किमया

दुष्काळी कर्जत-जामखेड तालुके झाले टॅंकरमुक्त, जलयुक्तची किमया

पावसाचे जास्तीत जास्त पाणी शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणीपातळीत वाढ करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे, जलस्त्रोतांतील गाळ लोकसहभागातून काढणे यासह इतर उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या उपक्रमास पाच जानेवारी, 2015 पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सुरु झालेल्या या टंचाईमुक्तीच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, गावांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढता लोकसहभाग, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेला पुढाकार कामे सुरु केलेल्या ठिकाणी ती कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह इतर यंत्रणांकडून सुरु असलेला पाठपुरावा यामुळे जलयुक्त शिवार अभियानात राज्य पातळीवरही अहमदनगर जिल्ह्याचे काम उठून दिसत आहे.

जिल्ह्यात यावर्षी 268 गावे या अभियानांतर्गत निवडण्यात आली आहेत. मागील वर्षी 271 गावे निवडण्यात आली होती. प्रगतीपथावर असणारी कामे पूर्ण करण्यासाठी कृषी, पाटबंधारे, लघुपाटबंधारे, भूजल सर्वेक्षण, वन विभाग व सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा अशा विविध यंत्रणांनी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे. यावर्षी पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडल्याने जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारात सगळीकडे पाणी साठल्याचे चित्र आहे. या अभियानाची कामे ज्या गावात झाली, तेथे पडलेल्या पावसाने या अभियानाची फलश्रृती खऱ्या अर्थाने दाखवून दिली. कर्जत-जामखेड या दुष्काळी तालुके अशी ओळख असणाऱ्या तालुक्यातील एकाही गावात टॅंकर लागत नाही, हे या अभियानाचे खऱ्या अर्थाने यश आहे.

डिकसळ, बहिरोबावाडी, करपेडी, मोहा, साकत अशी एक ना अनेक गावे या जलयुक्त शिवारात पाणीदार झाली आहेत.

काही वर्षापूर्वी डोक्यावर हंडा घेऊन आणि जीव धोक्यात घालून पिण्याचे पाणी आणण्यासाठी जीवाचा आटापीटा करणारी गृहिणी आता खऱ्या अर्थाने सुखावली आहे. विहिरीतून अगदी सहज पाणी काढता येईल, इतक्या विहीरी तुडूंब भरल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांचे हे दृश्य फळ जणू सर्वांना हवेहवेसे वाटते आहे. राज्यात जलसंधारण विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या प्रा. शिंदे यांनी जिल्ह्यातून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळेल, यासाठी पाठपुरावा केला. विशेषता दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण भागात त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यामुळेच कर्जत-जामखेडसह शेवगाव, पाथर्डी येथील जलसाठेही या पावसाने तुडूंब भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केवळ शासकीय यंत्रणा नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेचा सहभाग यामध्ये घेतला पाहिजे, हीच भूमिका पालकमंत्री प्रा. शिंदे आणि तत्कालिन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी घेतली. सध्याचे जिल्हाधिकारी श्री. महाजन यांनी या भूमिकेला बळ दिले. त्यामुळेच वर्षानुवर्षे टंचाई आणि दुष्काळ हे दोन शब्द परवलीचे असणाऱ्या कर्जत-जामखेड तालुक्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान हे खऱ्या अर्थाने जलसंजीवनी देणारे ठरले आहे. केवळ कार्यालयात बसून नव्हे तर शिवारात जाऊन, शेतकऱ्यांशी थेट चर्चा करुन, संवाद साधत आणि गावकऱ्यांची गावासाठी कामाची गरज लक्षात घेत कामांचे नियोजन केल्याने त्याचे दृश्य परिणाम दिसायला वेळ लागला नाही.

प्रसारमाध्यमांनीही या अभियानातील अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्याला सकारात्मक प्रसिद्धी देऊन अधिकाधिक नागरिकांपर्यंत हे अभियान पोहोचवल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वत:हून या पद्धतीची कामे होती घेतली.

टंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजनांवर होणारा खर्च प्रचंड होतो. दरवर्षी अशा स्वरुपाचा खर्च करावा लागतो. त्यामुळेच कायमस्वरुपी उपाययोजना करुन टंचाईमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जलयुक्त शिवार उपयुक्त असल्याचे पटल्यानेच आता या कामांचा वेग वाढू लागल्याने जिल्ह्यासाठी ही आशादायी गोष्ट ठरत आहे. विकास कामांत सहकार्य न करणारी गावे विकासाच्या प्रक्रियेत मागे राहतील, हा प्रशासनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला आणि लोकसहभागाचीही गती वाढली.

या जलयुक्त शिवार अभियानाचे नितळ यश म्हणजे कर्जत-जामखेड या दुष्काळी तालुक्यात दरवर्षी लागणारा टॅंकर यंदा मागवावा लागला नाही.

जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी दिलेली साथ म्हणजे राज्य शासन दुष्काळमुक्तीसाठी करत असलेल्या प्रयत्नांना दिलेला प्रतिसादच आहे. तो सतत वाढता राहील, असेच आशादायी चित्र आहे.

लेखक: दीपक चव्हाण

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate