निर्सगाच्या लहरीपणाचा फटका नेहमी खरीप पिकांना बसतो. शेतकरी पावसाच्या भरवाशावर शेतामध्ये खरीप पिकांची लागवड करतो. अवर्षणग्रस्त भागातील पिके पाण्याअभावी धोक्यात येतात. परंतु जलयुक्त शिवारच्या कामामुळे इंदापूर तालुक्यातील खरीप पिकांना नवसंजीवनी म्हणजेच टॉनिकच मिळाले आहे. त्याविषयी थोडक्यात..
इंदापूर तालुक्यात उजणी धरण प्रकल्पामुळे बराचसा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. तालुक्यातील काही भाग हा अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जलयुक्त शिवार अभियान 2016-17 अंतर्गत तालुक्यातील 15 गावांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार या गावांत 840 कामे चालू आहेत. 416 कामे पूर्ण झाली आहेत. 322 कामे प्रगतीपथावर असून जवळजवळ 5 कोटी 23 लाख रुपये खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फुर्तपणे दिलेला लोकसहभाग हे या अभियानाचे ठळक वैशिष्ट्य आहे. अभियानाद्वारे समाविष्ट बहुतांश गावात पाणी टंचाईचा प्रश्न सुटला आहे. गतवर्षी तालुक्यात जवळपास 25 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. चालू वर्षी टँकरची संख्या घटून 6 वर आली आहे. तालुक्याची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा माध्यमातून अकोले, पोंधवडी मदनवाडी, गोखळी व शेळगांव या गावांमध्ये जुन्या सिमेंट व माती नालाबांधातील गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ शेतकऱ्यांनी वाहतुकीसाठी स्वत: खर्च करुन शेतामध्ये पसरविला आहे. काही शेतकऱ्यांनी टेकड्यांवर गाळ पसरवून शेती सुपीक केली आहे.
सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला. जुन्या सिमेंट बांध तसेच माती बांध यातील गाळ काढल्यामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहीरींची पाणी पातळी वाढली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याबरोबरच जनावरांच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघाला आहे. परिसरातील जलस्त्रोत साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
तालुक्यात खरीपाचे पीक यामध्ये बाजरी, सोयाबीन, कांदा, भाजीपाला व मका यासारख्या पीकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. बंधाऱ्यातील पाणीसाठ्याने खरीप पिकांना संरक्षित पाणी उपलब्ध झाले आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाऊस लाबंला असला तरी खरीप पिकांना संरक्षित पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून पाण्याच्या निमित्ताने टॉनिकच मिळाले आहे. हे मात्र नक्की !
लेखक: शरद नलवडे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020