अलीकडे बदलत्या हवामानात पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता शेतकऱ्यांच्या हाती राहिली नाही. त्यातच त्यांच्या पायाखालून हळूहळू जमीनही सरकत चालली आहे, ही बाब अतिगंभीर म्हणावी लागेल.
पिकांच्या उत्पादनासाठी जमिनीतून अन्नद्रव्यांची उचल होते. जमिनीत अन्नद्रव्यांचे कमी होणारे प्रमाण भरून काढण्याकरिता योग्य खते आणि अन्नद्रव्यातील समतोलता साधणे महत्त्वाचे असते. मात्र याचा आपल्याला विसरच पडलेला दिसतो. एकीकडे संकरित व सुधारित वाणांच्या लागवडीमुळे प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उचल वाढली, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे एक पीक पद्धतीचा अवलंब, अमर्याद पाण्याचा वापर, शेणखताचा अपुरा पुरवठा, सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील कमी होत असलेले प्रमाण, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जैविक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराचा अभाव आदी कारणांमुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकताही कमी होत आहे. त्यापुढीलही टप्पा म्हणजे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राबविण्यात आलेल्या एका प्रकल्पांतर्गत झालेल्या अभ्यासात विदर्भातील जमिनीचे आरोग्य खालावत असल्याचे पुढे आले आहे. राज्यातील इतर भागांतील अभ्यासातही वेळोवेळी असेच धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. असे असताना या बाबींकडे होत असलेले सर्वांचे दुर्लक्ष परवडणारे नाही.
सातत्याने वाढत जाणाऱ्या लोकसंख्येची भूक आपल्याला मर्यादित शेती क्षेत्रातूनच भागवावी लागेल. अलीकडे बदलत्या हवामानात पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता शेतकऱ्यांच्या हाती राहिली नाही. त्यातच त्यांच्या पायाखालून हळूहळू जमीनही सरकत चालली आहे, ही बाब अति गंभीर म्हणावी लागेल. जमिनीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन हवे. त्याकरिता कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे याद्वारे प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर द्यावा लागेल.
प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा संतुलित वापर हा पिकांची उत्पादकता आणि गुणवता वाढीबरोबर एकमेकांस पूरक ठरतो. शिवाय जमिनीचे आरोग्यही टिकून राहते. नत्र, स्फुरद, पालाश या प्राथमिक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढीसाठी जस्त आवश्यक आहे.
स्फुरद जास्त झाले, तर जस्त आणि लोह ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत असूनही ती पिकांना उपलब्ध होत नाहीत. याकरिता भविष्यात सर्व शेतकऱ्यांकडून माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक, सेंद्रिय, जैविक खतांचा संतुलित वापर व्हायला हवा. शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्याकरिता शासन स्तरावर जमिनीचे नमुने घेऊन तपासणी चालू आहे.
यातील त्रुटी दूर करून या कामास गती मिळायला हवी. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात त्याच्या जमिनीची आरोग्य पत्रिका असायला हवी. जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीची शिफारस तज्ज्ञांकडून व्हायला हवी आणि पिकांच्या गरजेनुसारच संतुलित खतांचा वापर होईल ही काळजी सर्वांनी घ्यायला हवी. भविष्यात जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचेच आहे. अनेक प्रगत देश पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढविण्यावर भर देत आहेत. आपण किमान जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्याकरिता तरी प्रयत्न वाढवायला हवेत.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...